विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Kolhapur साऊंड सिस्टीम लावण्याच्या किरकोळ वादातून कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर मोठ्या दंगलीत झाले. सिद्धार्थनगर परिसरात शुक्रवारी रात्री जमावाने हाणामारी, दगडफेक केली तसेच अनेक वाहनांची तोडफोड करून त्यांना पेटवले. पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 100 ते 150 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.Kolhapur
घटना अशी की, भारत तरुण मंडळ प्रणीत राजेबागस्वार फुटबॉल क्लबचा वर्धापनदिन शुक्रवारी साजरा होत होता. स्वागत कमानीजवळ साऊंड सिस्टीम लावण्यात आली होती. मात्र त्यामुळे मुख्य रस्ता अडवला गेला. स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस दलाने हस्तक्षेप करून दुपारच्या सुमारास ती साऊंड सिस्टीम बंद केली. यामुळे मंडळाच्या सदस्यांत नाराजी निर्माण झाली.Kolhapur
रात्री सुमारे साडेनऊच्या दरम्यान मोठा जमाव सिद्धार्थनगरात पुन्हा जमा झाला. ढोल-ताशांच्या गजरात वर्धापन दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. मात्र काही तरुणांनी अचानक वाहनांची तोडफोड करत चारचाकी व दुचाकी उलटवून पेटवून दिल्या. या अचानक हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.Kolhapur
यानंतर एका गटाने परिसरात असलेला निळा ध्वज फाडल्याने दुसरा गट भडकला. परिणामी दोन्ही गट आमनेसामने येऊन दगडफेक सुरू झाली. काही काळ परिसरात प्रचंड धुमश्चक्री झाली. पेट्रोलने भरलेल्या बाटल्याही फेकण्यात आल्याचे आरोप आहेत. या गोंधळात अनेक लोक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस दलासह अतिरिक्त पोलीस फौजफाटा बोलावण्यात आला. अखेर काही तासांच्या प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या दरम्यान दहा पेक्षा जास्त दुचाकी, काही चारचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही महिलांचाही या दंगलीत सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले. महिला पोलिसांची संख्या कमी असल्याने पोलीस दलाला परिस्थिती नियंत्रणात आणताना मोठी कसरत करावी लागली.
या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “ही घटना गैरसमजातून घडली असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दंगल घडवून आणणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.”
कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या शहरात अशा प्रकारचे तणाव निर्माण होणे दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, वातावरण शांत करण्यासाठी सातत्याने गस्त घालण्यात येत आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या आणि पुरोगामी विचारांना जन्म देणाऱ्या कोल्हापूरच्या भूमीत दोन गटात वाद, संघर्ष होत असेल हे अत्यंत दुर्दैवी आहे. विचारांसाठी संपूर्ण देशाच्या नजरा या पुरोगामी विचारांच्या कोल्हापूरकडं कायम असतात. कोल्हापूरमध्ये आजपर्यंत कधीही न घडलेल्या अशा घटना अलीकडच्या काळात वारंवार का होतात, याचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे. माझी कोल्हापूरकरांनाही विनंती आहे की, आपण ज्या भूमीत जन्मलो त्या पवित्र भूमिला, विचारांना कोणतंही गालबोट लागू नये याची दक्षता घेण्याची जबाबदारी आपलीच असल्याने कुणाच्याही चिथावणीला बळी न पडता शांतता राखून कोल्हापूरच्या भूमीचा सन्मान कायम राखावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App