नाशिक मध्ये भरलेल्या डाव्या पक्षांच्या संमेलनामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी डाव्या पक्षांच्या एका चुकीमुळे भाजपचा विस्तार झाला, असा “जावईशोध” लावला. ती चूक म्हणजे जयप्रकाश नारायण यांनी 1977 मध्ये सर्व विरोधी पक्षांचे विलीनीकरण करून एकच जनता पक्ष काढायला सांगितले होते त्याला डाव्या पक्षांनी प्रतिसाद दिला नाही, पण जनसंघाने प्रतिसाद दिला त्यामुळे जनसंघाचे लोक सत्तेमध्ये शिरले त्यांनी देशातल्या वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये शिरकाव केला. डाव्या पक्षांनी जयप्रकाश नारायण यांना प्रतिसाद देऊन जनता पक्षात प्रवेश केला असता तर हे घडले नसते, असा दावा जयंत पाटलांनी केला.
जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे नेते असल्याने ते अभ्यासू असण्याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. कारण डाव्यांमधल्या कुठल्याही शेड मधले नेते उजव्यांमधल्या काही शेड मधल्या नेत्यांपेक्षा अधिक अभ्यासू असतात. त्यामुळे ते विशिष्ट बौद्धिक आर्ग्युमेंट करू शकतात. तसे आर्ग्युमेंट करून उजव्या पक्षांमधल्या नेत्यांना डाव्या पक्षांचा पराभव करता येत नाही. पण म्हणून डाव्या पक्षांच्या कुठल्याही शेड मधल्या नेत्यांचे सगळेच आर्ग्युमेंट खरे असते असेही समजायचे कारण नाही.
नेमके तसेच जयंत पाटलांच्या आर्ग्युमेंटचे झाले आहे. जयंत पाटलांनी डाव्या पक्षांच्या चुकीचे एक निदान बरोबर केले पण त्याचवेळी त्यांनी जनसंघाच्या नेत्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांचे आणि स्वयंसेवकांचे त्यानंतर भाजपच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे सगळे कष्ट एका झटक्यात नाकारून टाकले, जे वस्तुस्थितीला म्हणून अजिबात नव्हते.
– 1977 पेक्षाही मोठ्या चुका
पण त्या पलीकडे जाऊन डाव्यांनी फक्त 1977 मध्ये चूक केली. त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर कधी कुठल्या चुकाच केल्या नाहीत, असा आभास जयंत पाटलांनी निर्माण केला. तो देखील वस्तुस्थितीला धरून नाही. वास्तविक डाव्या पक्षांनी 1942 पासून 1996 पर्यंत फार मोठ्या चुका केल्या 1942 च्या चलेजाव आंदोलनात डावे पक्ष सहभागी झाले नव्हते. त्याचबरोबर त्यावेळची हिंदू महासभा देखील त्या आंदोलनात सहभागी झाली नव्हती. ते काँग्रेसचे आंदोलन होते असे सांगून ते मोकळे झाले होते. त्याचा फटका डाव्या पक्षांना आणि हिंदू महासभेला नंतरच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये बसला. कारण काँग्रेसला सगळी स्वातंत्र्य चळवळ “हायजॅक” करायला त्या निमित्ताने मोकळीक मिळाली. काँग्रेस सगळ्या देशात पसरू शकली, पण डावे पक्ष मात्र फक्त पश्चिम बंगाल आणि केरळ आणि महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मर्यादित राहिले. याला कारणीभूत डाव्या पक्षांची 1942 ची चूकच ठरली. याची कबुली कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी दिली होती.
– कम्युनिस्ट सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केले
डावे पक्ष डोईजड होऊ नयेत म्हणून इंदिरा गांधींनी 1959 मध्ये केरळचे नंबुद्रीपाद सरकार बरखास्त केले. त्यावेळी जनसंघाचा विस्तार झाला नव्हता. तो सत्तेच्या आसपासही नव्हता. त्यामुळे डाव्या पक्षांना पहिला फटका दिला तो जनसंघाने नव्हे, तर काँग्रेसने दिला, हे सत्य जयंत पाटलांनी सांगितले नाही.
त्यानंतर 1996 मध्ये पश्चिम बंगालचे त्यावेळचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांना पंतप्रधान पदाची संधी आली होती. ज्येष्ठता क्रमानुसार आणि राजकीय कर्तृत्वानुसार त्या पदावर त्यांचा हक्क देखील होता, पण त्यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोने ज्योती बसूंना पंतप्रधानपद स्वीकारण्यास प्रतिबंध केला. ही देखील डाव्या पक्षांची चूकच होती. कारण त्यावेळी डाव्या पक्षांच्या एकत्रित खासदारांची संख्या 60 + होती. जी नंतर कधीही त्यांना मिळवता आली नाही. पण डाव्या पक्षांच्या या चुकी विषयी देखील जयंत पाटील काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त डाव्या पक्षांच्या 1977 च्या चुकीविषयी निदान केले, पण ते अर्धवट ठरले.
– डाव्यांच्या कर्दनकाळ ममता
पश्चिम बंगालमधील डाव्यांची सत्ता भाजपने नव्हे, तर काँग्रेसी विचारसरणीच्या ममता बॅनर्जी यांनी उखडून फेकली. आणि आज तिथे डावे पक्ष औषधालाही शिल्लक नाहीत, याचे राजकीय श्रेय भाजप पेक्षा ममता बॅनर्जींना जास्त जाते. कारण पश्चिम बंगालमध्ये भाजप वाढायला 2014 नंतर सुरुवात झाली. तिथे डावे पक्ष ममता बॅनर्जी आणि भाजप या दोघांशी संघर्ष करण्यात यश मिळवू शकले नाहीत या सत्याची कबुली जयंत पाटलांनी दिली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App