MVA जागावाटपाचा घोळ आणि रोजच्या रोज सोडत असलेल्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या नॅरेटिव्ह सेटिंग मधून महाविकास आघाडी लोकसभा निकालातून मिळालेल्या “Advantage” गमावत असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीवर निर्णायक मात केली होती. 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला आणि 17 जागा महायुतीला मिळाल्यानंतर महायुतीचे मनोधैर्य खचल्यात जमा होते. त्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीसाठी मूळापासून तयारी करावी लागणार होती, तर महाविकास आघाडीला आहे तोच “राजकीय टेम्पो” टिकवून ठेवणे एवढेच काम करायचे होते, पण प्रत्यक्षात ते काम देखील महाविकास आघाडीतल्या नेत्यांना जमले नसल्याचेच जागावाटपाच्या घोळातून आणि दररोजच्या वेगवेगळ्या Narrative setting मधून समोर आले आहे.Loksabha Elections
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 400 पार घेऊन सत्तेवर आला, तर राज्यघटना बदलणार हा एकमेव “Narrative” चालला. त्यातून महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. पण आता पाहू गेल्यास महाविकास आघाडीचे नेते दररोज वेगवेगळे नॅरेटिव्ह मांडत चालले आहेत. त्यातून महायुतीला पूर्णपणे “कॉर्नर” करण्याऐवजी ते महाविकास आघाडीलाच वेगवेगळ्या नॅरेटिव्हच्या गुंत्यात अडकवत चालले आहेत.
मतदार याद्यांवरच आक्षेप
आत्तापर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते कुठल्याही निवडणुकीच्या मतदानानंतर आणि मतमोजणी नंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) वर आक्षेप घेत होते, पण कालपासून त्यांनी वेगळाच “नॅरेटिव्ह” चालवायचे काम सुरू केले. मतदार याद्या आणि तिच्या नोंदणीवरच महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आक्षेप घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारस्थान रचून 150 मतदार संघातील प्रत्येकी 10 ते 15 हजार नावे वगळल्याचा दावा नाना पटोले आणि संजय राऊत यांनी केला. निवडणूक आयोगावर त्यांनी पूर्वी आक्षेप घेतले होतेच, पण यावेळी प्रत्यक्ष मतदान व्हायच्या आधीच असले आक्षेप घ्यायला त्यांनी सुरुवात केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एखाद्या यंत्रणेवर असे सतत आक्षेप घेतल्याने त्या यंत्रणेची विश्वासार्हता धोक्यात येते, यात शंका नाही, पण वारंवार आक्षेप घेणाऱ्याचीही विश्वासार्हता टिकून राहत नाही, ही वस्तुस्थिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही.
– अमित शाह राष्ट्रपती राजवट लावणार
त्याचवेळी आज संजय राऊत यांनी तर नवेच narrative setting सुरू केले. अमित शाह म्हणे, निवडणूक झाल्या झाल्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणार. महाविकास आघाडीला ते नेताच निवडू देणार नाहीत. समजा महाविकास आघाडीने तातडीने आपला नेता निवडला, तर त्याचा शपथविधी होऊ देणार नाहीत. यासाठी अमित शाह निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. हा दावा देखील जर – तर असल्याच भाषेवर अवलंबून आहे, ज्याला कोणताच आधार नाही. महायुतीचे मोठे नेते तर संजय राऊत नावाच्या प्रवक्त्याला उत्तर द्यायचा फंदातही पडत नाहीत. यातून राऊतांची विश्वासार्हता किती घसरली आहे, हेच समोर येते.
– जागावाटपाचा घोळ अकारण विदर्भापर्यंत
त्यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपात जो घोळ घालून ठेवलाय, त्याला तर तोडच नाही!! वास्तविक लोकसभा निवडणुकीत मिळालेला “अडव्हांटेज” टिकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने लवकरात लवकर जागावाटप जाहीर करून उमेदवारी याद्याही जाहीर करायला हव्या होत्या. आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या सगळ्याच उमेदवारांची प्रचाराची पहिली फेरी देखील संपायला हवी होती. परंतु, प्रत्यक्षात प्रचाराची पहिली फेरी संपणे तर सोडाच, ती सुरू देखील होऊ शकलेली नाही. कारण आघाडीतल्या कुठल्याच पक्षांना नेमक्या कुठल्या जागा मिळणार आणि तिथे कोण उमेदवार असणार, हेच अद्याप ठरवता आलेले नाही. आधी उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर देखील शरद पवारांनी काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा तिढा वाढवून ठेवला. त्यात आता जागावाटपाचा घोळ थेट विदर्भापर्यंत नेऊन भिडवला. जिथे शिवसेनेची ताकदच नाही, तिथल्या जागा मागायला सुरुवात करून त्यांनी काँग्रेसची कोंडी केली. यातून काँग्रेसची कोंडी जरी झाली, तरी एकूण महाविकास आघाडीचे “फसगे” झाले. यातूनच महाविकास आघाडीचे नेते लोकसभेच्या निकालातून मिळालेला “Advantage” गमावत आहेत, हेच चित्र महाराष्ट्रासमोर आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App