विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत नाशिक आणि नागपूर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जी बंडखोरी झाली आहे, त्यातून शिवसेना – काँग्रेस यांच्यातले केवळ मतभेदच समोर आले असे नाहीतर मूळातच महाविकास आघाडीची प्रासंगितताच संपुष्टात आल्याचे ते निदर्शक ठरले आहे. Maharashtra legislative council Elections; Importance of MVA comes to an end
राष्ट्रवादी काँग्रेसने तर मूळातच या वादातून अंगच काढून घेतले आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची जी बैठक होणार होती, ती रद्द करून नाना पटोले आणि संजय राऊत वगैरे नेते एकमेकांशी फक्त फोनवर बोलले. त्यातून निर्णय काही झाला नाही पण काँग्रेस मधले अंतर्गत मतभेद आणि काँग्रेस शिवसेना यांचे मतभेद यामुळे अजितदादा बैठक रद्द होण्यापूर्वीच साताऱ्याला निघून गेल्याची बातमी मराठी माध्यमांनी दिली आहे. इतकेच नाही तर येत्या चार-पाच दिवसांत मी सगळे उघड बोलेन, असा इशारा नाशिक मधले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांनी दिला आहे, तर दुसरीकडे नागपूर मधले अपक्ष उमेदवार सत्तेची सतीश इटकेलवार यांनी आपल्या मागे अदृश्य शक्ती असल्याचा दावा करून महाविकास आघाडीत आधीच असलेल्या संशयाच्या भूताच्या फुग्यात आणखी हवा भरली आहे.
यातून महाविकास आघाडीत समन्वयाचा अभावच एक्सपोज झाला असे नाही, तर महाविकास आघाडीचे औचित्यच या निमित्ताने संपुष्टात आले आहे. सत्ता गेल्यानंतर तशीही महाविकास आघाडीची प्रासंगिकता उरलीच नाही. प्रत्येक घटक पक्ष केवळ आपापल्या राजकीय तत्त्वज्ञानानुसार नव्हे, तर महाराष्ट्रातल्या पॉलिटिकल स्पेसचा विचार केला तर एकमेकांशी किती जुळवून घेऊ शकला असता याविषयी शंकाच आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कितीही आपण एकत्र येऊन भाजप – बाळासाहेबांची शिवसेना या युतीशी टक्कर घेऊ अशी भाषा केली असली तरी प्रत्यक्षात जागा वाटपाच्या खडकावर त्यांचे तारू फुटलेच असते. कारण प्रत्येक महापालिका आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत कमीत कमी जागांवर निवडणूक लढवून आपला पक्ष विशिष्ट मर्यादेपलिकडे वाढणार नाही याची पक्की जाणीव शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना आहे.
त्यामुळे तसेही निवडणूक पूर्व युती करून निवडणुकीला सामोरे जाण्यापेक्षा निवडणुकीनंतर आघाडी करून सत्तेतला वाटा मिळवणे हाच महाविकास आघाडी बनविण्याचा हेतू होता. तो त्यावेळीच साध्य झाला आणि सत्ता गेल्यानंतर त्याची प्रासंगिकता आणि औचित्य संपले. विधान परिषद निवडणुकीतल्या नाशिक आणि नागपूर मतदार संघातल्या बंडखोरीने हे औचित्य संपल्याचा मुद्दा अधिक ठळक केला आहे एवढेच!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App