विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कुतुबमिनार परिसरात उभी असलेल्या ‘कुव्वत उल इस्लाम’ मशीद २७ हिंदू आणि जैन मंदिरांना पाडून उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. मदिंरे पाडून मशीद उभारल्याचे सिद्ध करणारे अनेक पुरावे इतिहासात उपलब्ध असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.
दिल्लीतील वकील हरिशंकर जैन यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दिल्लीच्या साकेत कोर्टात मंगळवारी जवळपास एक तास सुनावणी झाली. या मशिदीसाठी पाडण्यात आलेली मंदिरं पुन्हा उभारून या स्थळावर विधीपूर्वक २७ देवी-देवतांची पूजा करण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हरिशंकर जैन आणि रंजना अग्निहोत्री यांनी जैन तीर्थकर ऋषभ देव आणि भगवान विष्णू यांच्या नावानं ही याचिका दाखल केलीय. अनुच्छेद २५ आणि २६ नुसार मिळालेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार मंदिरांच्या पुनर्स्थापनेसाठी ही याचिका दाखल करत असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलंय.
याचिकेची आणि त्यात करण्यात आलेल्या दाव्यांचा बारकाईनं अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचं न्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटलंय. या प्रकरणात पुढची सुनावणी २४ डिसेंबर रोजी होणार आहे. १३ व्या शतकात उभारण्यात आलेला कुतुबमिनार युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे.