विशेष प्रतिनिधी
पुणे : केन्द्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या तत्परतेमुळे दिल्लीत अडकून पडलेले सव्वा तीनशे मराठी विद्यार्थी सोमवारी (ता. 18) पहाटे विशेष रेल्वेने पुणे स्थानकावर पोहोचले. महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून सोडण्यात आलेली विशेष ट्रेन पुणे रेल्वे स्टेशन येथे आज पहाटे 3:10 वाजता पोहोचली. या एकूण 325 विद्यार्थी पोहोचले, त्यापैकी पुणे जिल्ह्यातील 97 विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करण्यात आली.
कोविड १९ संदर्भात संशयित आढळले नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये एसटी बस मार्फत पाठविण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बसने पाठवण्यात आले.
तसेच काही विद्यार्थी स्वतःच्या वाहनाने घरी गेले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली उप जिल्हाधिकारी अमृत नाटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोदी सरकारचे आभार मानले.
उर्वरित विद्यार्थी राज्याच्या विविध भागातील होते. त्यांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना एसटी व अन्य खासगी वाहनांनी रवाना करण्यात आले.