वृत्तसंस्था
नवी दिल्ली : “राफेल विमान आणि एस -400 च्या आगमनात विलंब झाला आहे. प्रशिक्षण आणि पुरवठा साखळी खंडित झाल्याने सुमारे दोन महिन्यांनी उशीर झाला आहे. तरी राफेलचा पहिला ताफा जुलैअखेरपर्यंत भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. एस -400 विमानांच्या आगमनातील विलंबही कमीतकमी करण्याचा प्रयत्न चालू आहे,” अशी माहिती एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया सुशांत सिंग यांनी दिली.
चीनी विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर वायुसेनेच्या अर्थसंकल्पातील कपात आणि आधुनिकीकरण यासंदर्भात ते बोलत होते.
लष्कर प्रमुखांनी अलीकडेच सांगितले की लष्करासाठीच्या सुरुवातीच्या 20% अर्थसंकल्पात कपात करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. भारतीय हवाई दलातही याच पध्दतीने कपात केली गेली तर हे आव्हान कसे सोडवाल? वायू सेनेच्या आधुनिकीकरण योजनांवर याचा कसा परिणाम होईल, असे प्रश्न वायू दल प्रमुखांना विचारण्यात आले.
त्यावर एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया सुशांत सिंग म्हणाले की, या वर्षासाठीचा सुधारित अर्थसंकल्पीय अंदाज अद्याप प्राप्त झालेला नाही. तथापी पहिले पाऊल म्हणून आपण देशी उत्पादनावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आमची सर्वोच्च प्राथमिकता एअर-टू-एअर क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याच्या प्रेसिजन गाईड म्युनिशन्ससारख्या उच्च तंत्रज्ञानाची शस्त्रे तयार करण्यास आहे.
भारतीय वायू सेना उत्तर आणि पश्चिमेकडील घडामोडींकडे दुर्लक्ष करू शकत नाही; आमचे दोन्ही विरोधक त्यांची शस्त्रांची यादी सतत वाढवत असतात. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीकोन योजनेचा भाग म्हणून भारतीय वायू सेनेनेही ‘मेक इन इंडिया’ची आपली योजना आखली आहे. लढाऊ विमानांची दुसरी फळी तयार करण्याची सरकारची योजना आहे.