विशेष प्रतिनिधी
नागपूर : देशात पूर्णपणे नियंत्रणात असलेला कोरोना, तबलिगी जमातच्या मरकजनंतर देशभरात वेगाने पसरला हे चीनी व्हायरसच्या वाढत्या रुग्णांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. मात्र, मरकजनंतर विविध राज्यांमध्ये जाऊन लपून बसलेल्या तबलिगी जमातच्या सदस्यांचा शोध घेण्यासाठी मुस्लिम समुदाय देखील सरकारची मदत करीत आहे. त्यांचे हे सहकार्य कौतुकास्पद असेच आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले.
मुस्लिमांमधूनच तबलिगींना विरोध होत असल्याचेही त्यांनी सांगितले. मनमोहन वैद्य म्हणाले, ‘‘तबलिगींच्या मरकजपूर्वी देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण अतिशय कमी होते. मात्र, मरकजमुळे यात दुपटीने वाढ झाली आहे. देशात कोरोनाचा प्रसार होत असताना, तबलिगी जमातने स्थिती अधिक योग्यप्रकारे हाताळायला हवी होती.
त्यांच्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. मरकजच्या आधी आणि त्यानंतरच्या आकडेवारीतून वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यांचा खरा उद्देश लोकांपुढे आला आहे. देशात चीनी व्हायरसला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना आणि घेण्यात आलेल्या निर्णयांचे वैद्य यांनी कौतुक केले आहे.
भारताने चीनी व्हायरसचा सामना करण्यासाठी विकसित देशांच्या तुलनेत चांगलं काम केलं आहे. कोरोनाचे थैमान सुरू असलेल्या इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतीय नेतृत्वाने अतिशय प्रभावीपणे स्थिती हाताळली आहे. काही धाडसी निर्णयांनाही जनतेचे समर्थन प्राप्त होत आहे, असे त्यांनी सांगितले. चीनी व्हायरसच्या पृष्ठभूमीवर देशात जाहीर करण्यात आलेल्या
लॉकडाऊनच्या काळात रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी सुमारे २५.५० लाख नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. याशिवाय, गरीब आणि रोजंदारीवरील मजुरांना दोन वेळचे जेवण देण्यासह, तत्काळ मदतीसाठी हेल्पलाईनही सुरू केलेली आहे, असे वैद्य म्हणाले. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, असे सांगुन वैद्य म्हणाले, संघाची १५ मार्च रोजीची अ. भा. प्रतिनिधी सभा व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने स्थगित करण्यात आली होती.तबलिगी जमातनेही आपला मरकजचा कार्यक्रम स्थगित करायला हवा होता. बंगळुरू येथील प्रतिनिधी सभेत १५०० प्रतिनिधी सहभागी होणार होते. त्या सर्वांना रेल्वे गाड्या आणि विमानांचे तिकीट रद्द करण्यास सांगण्यात आले, तसेच जे प्रतिनिधी आधीच बंगळुरूत दाखल झाले होते, त्यांनाही तातडीने परत पाठविण्यात आले. याशिवाय, स्वयंसेवकांसाठी दरवर्षी आयोजित केला जाणारा संघ शिक्षा वर्ग आणि जूनपर्यंत होणारे इतर कार्यक्रमही रद्द करण्यात येणार आहेत.
चीनी व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या अर्थव्यवस्थेवर होणार्या परिणामांबाबत प्रश्नावर डॉ. वैद्य म्हणाले, चीनी व्हायरसला आळा घालणे आणि नागरिकांचे प्राण वाचविण्यास प्रथम प्राधान्य दिले जावे. हे सर्व करताना, अर्थव्यवस्थेवर कमीतकमी परिणाम होईल, याची काळजी सरकार नक्कीच घेईल, अशी आशा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App