रोहिंग्या घुसखोर मुस्लिमांच्या दिल्लीतील अवैध झोपडपट्ट्यांवर बुलडोझर; अवैध मशिदही जमीनदोस्त
प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीच्या दिल्लीतील जमिनीवर रोहिंग्या मुस्लिमांनी बेकायदेशीर कब्जा केला होता. त्याविरोधात योगी आदित्यनाथ सरकारने गुरुवारी पहाटे धडक कारवाई करून रोहिंग्यांच्या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरवून १५० कोटी रूपये किंमतीची ५ एकर जमीन सोडवली. Yogi punishes Rohingya infiltrators in Delhi
दिल्लीतील मदनपूर खादर परिसरामध्ये उत्तर प्रदेश सरकारच्या जलसिंचन विभागाची सुमारे ५ एकर जमीन आहे. या जमिनीची आजच्या बाजारभावाने किंमत जवळपास १५० कोटी रूपये आहे. गेल्या काही वर्षांपासून रिकाम्या असलेल्या या जमिनीवर प्रथम स्थानिक लोकांनी बेकायदेशीरपणे कब्जा केला होता. त्यानंतर तेथे स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने जाणीवपूर्वक रोहिंग्या मुस्लिम घुसखोरांना वसविण्यात आले होते. रोहिंग्यांनी तेथे आपली वसाहतच निर्माण करून काही पक्की घरे आणि मशीद बांधली होती.
मात्र, उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीच्या असलेल्या दिल्ली आणि राज्यातील अवैध कब्जा केलेल्या जमिनी मुक्त करण्याचे योगी आदित्यनाथ सरकारचे धोरण आहे. त्यानुसार, उत्तर प्रदेश सिंचन विभागाद्वारे त्यासाठी विशेष अभियान चालविण्यात आले. अवैध जमिन मुक्त करण्यापूर्वी सिंचन विभागाने सदर प्रकाराची माहिती दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांना देण्यात आली. जमीन सोडवण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे नायब राज्यपालांनी आश्वासन दिले. त्यानंतर गुरुवारी सकाळी ४ वाजेच्या सुमारास जलसिंचन विभागाने घुसखोर रोहिंग्यांच्या अवैध वसाहतीवर बुलडोझर फिरवून ती मुक्त केली. यावेळी रोहिंग्यांनी बांधलेल्या बेकायदेशीर मशिदीसही जमिनदोस्त करण्यात आले.
– अवैध कब्जा मोडून काढणे हेच योगी सरकारचे धोरण
उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीच्या दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी आहेत. मात्र, त्यांच्यावर सध्या अवैध कब्जा करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश वेळोवेळी अवैध कब्जा मोडून काढण्याचे धोरण राबवित असते. उत्तर प्रदेशातही त्यासाठी अँटी भूमाफिया टास्क फोर्सद्वारे अवैध कब्जे मोडून काढले आहेत. दिल्लीतील कारवाईदेखील त्याच अनुषंगाने करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे दिल्लीतील या जमिनीवर रोहिंग्यांनी कब्जा केला होता. उत्तर प्रदेश सरकारसाठी ही बाब अतिशय चिंताजनक होती. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून योगी आदित्यनाथ सरकारने रोहिग्यांनी बळकाविलेली जमिन मुक्त केली आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेश भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.
– आप आमदाराचा रोहिंग्यांना पाठिंबा ?
कारवाई करण्यात आलेला मदनपूर खादर हा परिसर दिल्लीतील ओखला विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. या मतदारसंघामध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टीचे अमानतुल्लाह खान हे आमदार आहेत. दिल्लीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या दंगलीचा मुख्य सूत्रधार अमानतुल्लाह खान असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे आपल्या पदाचा गैरवापर करून आप आमदारानेच रोहिंग्या मुस्लिमांना तेथे वसविले नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App