वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अपयशावर बोट ठेवण्यासाठी कोविड श्वेतपत्रिका काढली नाही, असे सांगत काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या अश्रूंनी लोक वाचले नाहीत. त्यांच्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था केली असती तर वाचले असते, असे टीकास्त्र सोडले आहे.PM’s tears did not save the lives of people but oxygen could have: Rahul Gandhi, Congress
राहुल गांधींनी आज काँग्रेसने काढलेली कोविड १९ श्वेतपत्रिका आज पत्रकार परिषदेत प्रसिध्द केली. सरकारवर बोट ठेवण्यासाठी ही श्वेतपत्रिका काढलेली नाही. देशाला मार्गदर्शन व्हावे. कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्यावेळी आरोग्य व्यवस्थापन व्यवस्थित व्हावे, या हेतूने ही श्वेतपत्रिका काढली आहे, असे राहुल गांधी सुरूवातीला सांगितले.
त्यानंतर सगळ्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. ते म्हणाले, की कोविडच्या पहिल्या दोन्ही लाटांमध्ये सरकारचे व्यवस्थापन चुकले. त्याची कारणे आम्ही श्वेतपत्रिकेत दिली आहेत. आरोग्य सुविधा योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी उपलब्ध करून दिल्या असत्या तर मृतांची संख्या रोखता आली असती. ९० टक्के जणांचे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले आहेत.
देशात ऑक्सिजनची कमतरता नव्हती. पण त्याचे योग्य व्यवस्थापन झाले नाही. योग्य वेळेत तो आवश्यक ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आला नाही. पंतप्रधांनांच्या अश्रूंनी लोकांचे प्राण वाचले नाहीत. ऑक्सिजन उपलब्ध करून दिला असता तर मात्र, लोकांचे प्राण नक्की वाचले असते, असे खोचक उद्गार राहुल गांधी यांनी काढले.
काल झालेले विक्रमी लसीकरण ही चांगलीच गोष्ट आहे. पण लसीकरणाची हा वेग कायम राखता आला पाहिजे. तिसरी लाट येते आहे. तिला रोखण्यासाठी लवकरात लवकर देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले पाहिजे, अशी मागणी देखील राहुल गांधींनी केली.