जाणून घ्या, नेमकं काय घडलं, शशी थरूर काय म्हणाले आणि काय होता प्रश्न?
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : Shashi Tharoor काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ अमेरिकेत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक मोहिमेचा भाग म्हणून हे शिष्टमंडळ अमेरिकेत पोहोचले आहे. हे शिष्टमंडळ राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे पोहोचले तेव्हा तिथे एक भावनिक क्षण पाहायला मिळाला.Shashi Tharoor
एका पत्रकार परिषदेदरम्यान एका अमेरिकन पत्रकाराने काँग्रेस खासदार शशी थरूर यांना एक प्रश्न विचारला. हा पत्रकार दुसरा तिसरा कोणी नसून शशी थरूर यांचाच मुलगा इशान थरूर होता. मुलाच्या प्रश्नाचे उत्तर देताना काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, पाकिस्तानविरुद्ध ठोस पुरावे नसल्यास भारताने ऑपरेशन सिंदूर चालवले नसते.
शशी थरूर यांचा मुलगा इशान थरूर हा व्यवसायाने पत्रकार आहे, त्याने त्याचे वडील शशी थरूर यांना प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. यानंतर त्याने दहशतवादावर एक गंभीर प्रश्नही विचारला. तत्पुर्वी, ईशानने माइक हातात घेताच, काँग्रेस खासदार थरूर हसले आणि उत्तर देण्यापूर्वी त्याला माइक व्यवस्थित उचलण्याचा इशारा केला.
यासोबतच थरूर हसत म्हणाले, याची परवानगी नाही दिली पाहिजे, हा माझा मुलगा आहे. त्यानंतर ईशान थरूर याने त्यांच्या वडिलांना विचारले, ‘पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा भारताकडे कोणत्याही देशाने मागितला आहे का, कारण पाकिस्तानने वारंवार ते नाकारले आहे?’
शशी थरूर यांनी उत्तर दिले की कोणत्याही परदेशी सरकारने पाकिस्तानविरुद्ध पुरावे मागितले नाहीत. परंतु माध्यमांनी निश्चितच ते मागितले आहे. ते म्हणाले की भारताने पूर्ण खात्री केल्यानंतरच कारवाई केली आणि आंतरराष्ट्रीय समुदायालाही माहिती आहे की पाकिस्तान सतत दहशतवादाला पाठिंबा देत आहे. थरूर म्हणाले की पाकिस्तानकडून भारतावर ३७ दहशतवादी हल्ले झाले आणि प्रत्येक वेळी त्यांनी सहभाग नाकारला. त्यांनी लादेनच्या आपल्या देशात उपस्थिती देखील नाकारली, परंतु तो तिथेच सापडला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App