वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय ऐक्याच्या मूलभूत सूत्रावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुप्रीम कोर्टाच्या 370 कलम हटविण्यावर शिक्कामोर्तब करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक सविस्तर ट्विट करून # नया जम्मू कश्मीर म्हणत देशाला राजकीय संदेशही दिला.Supreme Court seal on Indian unity formula; Welcoming the decision by Prime Minister Narendra Modi calling it #NewJammuKashmir!!; Nadda’s tweet too
जम्मू कश्मीर मधून 370 कलम हटविणे घटनात्मक दृष्ट्या वैध आहेच, जम्मू-काश्मीर मधून वेगळ्या काढून केंद्रशासित प्रदेश करणे यालाही घटनात्मक मान्यता आहे, तसेच जम्मू-काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा बहाल करून तेथे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घ्याव्यात, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी स्वतंत्र ट्विट करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :
सुप्रीम कोर्टाने भारतीय ऐक्याच्या मुख्य सूत्रावर आज शिक्कामोर्तब केले. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर घटनात्मक शिक्कामोर्तब झाल्याने भारतीय संसदेने 5 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेला निर्णय वैध ठरला. जम्मू कश्मीर आणि लडाख मधील आमच्या बंधू भगिनींच्या प्रगतीसाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरला आहे.
या निमित्ताने जम्मू कश्मीर आणि लडाख मधल्या बंधू-भगिनींना मी आश्वस्त करतो की, 370 कलमामुळे समाजातल्या ज्या लोकांपर्यंत विकासाची फळे पोहोचत नव्हती, त्यांच्यापर्यंत विकास पोहोचवण्यात आणि त्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. जम्मू कश्मीर आणि लडाख मधील बंधू-भगिनींच्या सर्व प्रकारच्या विकासाची मी ग्वाही देतो. त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नची पराकाष्ठा करू.
सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय केवळ एक घटनात्मक वैधता प्राप्त करून देणारा नाही, तर अखंड भारताच्या प्रगतीचा आणि जनतेच्या इच्छा आकांक्षापूर्तीचा एक महामार्ग यातून खुला झाला आहे. *#नवा जम्मू कश्मीर घडवण्याचे पुढचे पाऊल पुढचे दमदार पाऊल यातून पडले आहे.*
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये #नया जम्मू कश्मीर ही नवी घोषणा देऊन संपूर्ण देशासमोर जम्मू-काश्मीरच्या विकासाचा नवा रोड मॅप केंद्र सरकारने आखल्याचे सुचित केले आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देऊन लवकरच तिथे निवडणुका होतील, असेही सूचित केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी देखील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करणारे ट्विट करून जम्मू काश्मीर विकासाच्या मार्गाने आता वेगाने वाटचाल करेल, अशी ग्वाही दिली आहे.