विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rahul Gandhi राहुल गांधी यांच्याकडून निवडणूक आयोगासमोर अधिकृत निवेदन देण्याऐवजी माध्यमांतून आरोपांचे वार करणे सुरू आहे. आयोगाशी अधिकृतपणे संवाद साधणे राहुल गांधी टाळत आहेत. आतापर्यंत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला साधे पत्रही लिहिले नाही.Rahul Gandhi
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कथित “मॅच फिक्सिंग” झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकताच केला होता. परंतु, या आरोपांवर ठोस पावले उचलण्याऐवजी राहुल गांधींनी केवळ माध्यमांमधून किंवा सोशल मीडियावर वक्तव्य करणे पसंत केले, असा आरोप निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आला आहे.
रविवारी निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट सांगितले की, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाशी आजवर कोणताही अधिकृत पत्रव्यवहार केलेला नाही. बैठकीसाठी वेळ मागण्याची तसदीही घेतलेली नाही. “जर तुम्ही निवडणूक प्रक्रियेवर शंका घेत असाल आणि तुम्हाला गंभीरता असेल, तर अधिकृत मार्गाने पत्र पाठवून चर्चेसाठी पुढे या. अन्यथा हे फक्त राजकीय ढोंग ठरेल,” असे आयोगाने स्पष्ट केले.
७ जून रोजी राहुल गांधींनी माध्यमांमधून लेख प्रसिद्ध करत महाराष्ट्र निवडणुकीतील कथित घोटाळ्यावर सवाल उपस्थित केले होते आणि बिहार निवडणुकीतही तोच प्रकार होईल, असा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी X या प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “निवडणूक आयोगाने स्वाक्षरी नसलेल्या नोट्स देऊन गंभीर प्रश्न टाळू नयेत. जर लपवण्यासारखे काही नसेल, तर माझ्या प्रश्नांची उत्तरं सार्वजनिक करा.”
या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर देताना सांगितले की, “आयोगाच्या देशभरातील १०.५ लाख बूथ लेव्हल अधिकारी, ५० लाख मतदान अधिकारी आणि १ लाख मतमोजणी पर्यवेक्षक हे सर्व अत्यंत निष्ठेने काम करतात. राहुल गांधींच्या अशा निराधार आरोपांमुळे त्यांचं मनोधैर्य खचतं, आणि त्यांच्या कामावर संशय घेतला जातो.”
राहुल गांधींनी मतमोजणी केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यावर आयोगाने उत्तर दिलं की, “हायकोर्टाच्या निर्देशांनुसार मतदारांच्या गोपनीयतेचं रक्षण करण्याच्या अटींवरच ही फुटेज तपासली जाऊ शकतात. काँग्रेसचे एजंट्स प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावर होते, मग आता गोपनीयतेचा भंग करून फुटेज मागण्यामागे नेमकं उद्दिष्ट काय आहे? त्यांना न्यायालयावरही आता विश्वास राहिलेला नाही का?”
२४ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून एक सविस्तर उत्तर पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांच्या सर्व शंका आणि आरोपांची पूर्तता करण्यात आली होती. हे उत्तर आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरही आज उपलब्ध आहे. तरीही राहुल गांधी हेच मुद्दे पुन्हा-पुन्हा उपस्थित करत आहेत, यामागे राजकीय हेतू असल्याचं आयोगाने सूचित केलं आहे.
राजकीय मतभेद असले तरी देशातील सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया ही स्पष्ट, पारदर्शक आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत होते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबद्दल वारंवार आणि आधारहीन आरोप करून देशातील संस्थांचा अपमान करणं थांबवावं, अशी मागणी आयोगाने केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App