विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली S. Jaishankar व भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन देशांमधील वाद नाही, तर तो जागतिक दहशतवादाविरुद्धचा निर्णायक लढा आहे. पाकिस्तानने ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी घातले आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर एक दिवस हा दहशतवाद तुमच्या घरापर्यंत येईल असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना दिला आहे.S. Jaishankar
युरोपमधील प्रतिष्ठित युराअँक्टिव्ह पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत डॉ. जयशंकर यांनी पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत, पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांवर कडाडून टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आज तुम्ही पाकिस्तानला दुर्लक्षित करत आहात, उद्या हेच विष तुमच्या अंगणात पसरलेलं असेल.”
काही पाश्चिमात्य माध्यमांनी ऑपरेशन सिंदूरला “टिट-फॉर-टॅट” म्हणजे ‘जशास तसे’ प्रकारची प्रतिक्रिया म्हटल्यावर डॉ. जयशंकर यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ही कोणतीही प्रतिक्रियात्मक कारवाई नाही. ही भारताची आणि मानवतेची दहशतवादाविरुद्धची लढाई आहे. भारतावर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आम्ही शांत बसलो नाही. ही कारवाई म्हणजे जगालाही संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे की दहशतवादाविरोधात आता सहनशीलता चालणार नाही.”
डॉ. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर थेट प्रहार करताना सांगितले की, “पाकिस्तान सरकार केवळ दहशतवाद्यांना पाठीशी घालत नाही, तर त्यांना आश्रय, आर्थिक मदत आणि प्रशिक्षणही देते. अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेन अनेक वर्षे पाकिस्तानच्या अॅबटाबाद शहरात, त्यांच्या सैनिकी प्रशिक्षण केंद्राजवळ का राहू शकला? हेच सिद्ध करतं की पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा मुख्य केंद्रबिंदू आहे.”
जयशंकर म्हणाले की, “दहशतवादाविरुद्ध बोलणं आणि त्याचवेळी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांशी संबंध ठेवणं, हे दुटप्पी धोरण चालणार नाही. आज पाकिस्तानला दुर्लक्षित करणे म्हणजे उद्या तुमच्या देशांत दहशतवादाचं थैमान स्वीकारण्यासारखं आहे. तुमचेच नागरिक त्याचा बळी ठरतील.”
आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या पार्श्वभूमीवर बोलताना जयशंकर म्हणाले की, “युरोपसाठी भारत हा चीनपेक्षा अधिक विश्वासार्ह, लोकशाही मुल्यांवर आधारित, कुशल आणि टिकाऊ भागीदार आहे. आम्ही जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेला देश आहोत. आमच्याकडे कुशल श्रमशक्ती आहे, आणि आम्ही कायदेशीर चौकटीतच काम करतो. भारत युरोपसाठी दीर्घकालीन आणि सुरक्षित पर्याय आहे.”
गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले होते. या हल्ल्यानंतर भारत सरकारने तातडीने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करत जोरदार कारवाई केली. भारतीय लष्कराच्या या कारवाईत अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App