विशेष प्रतिनिधी
मुंबई – शिवसेनेतून बाहेर पडावे लागल्यानंतर नारायण राणे यांचा राजकीय विजनवास हा त्यांच्या राजकीय कुवती बरहुकूम भाजपमध्ये येऊन संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवून महाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला आहे. Not congress or sharad pawar could end Narayan Rane`s political ambition with honour
नारायण राणे यांना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये घेताना सोनिया गांधींनी मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते. त्या अटीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात तुलनेने दुय्यम खाते देखील स्वीकारले होते. त्यांनी काही वर्षे काँग्रेसमध्ये वाट पाहिली.
काँग्रेसचे राजकीय दिवस चांगले असताना नारायण राणे यांना राज्यातल्या कॅबिनेट मंत्रीपदाखेरीज दुसरे काहीही दिले नाही. सोनिया गांधी तर त्यांना दिलेले मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देखील विसरल्या होत्या.
राणे यांनी सोनिया गांधींची भेट घेण्याचे अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. जेव्हा त्यांना दिल्लीत जाऊनही भेट नाकारण्यातच आली तेव्हा नारायण राणेंचा शिवसेनेतला आक्रमक स्वभाव उफाळून आला आणि त्यांनी थेट सोनिया गांधींवरच आश्वासन न पाळल्याची जाहीर तोफ डागली होती. अखेरीस त्यांना काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले होते.
यानंतर त्यांनी शरद पवार यांच्याशीही राजकीय संधान साधून पाहिले. पण पवारांच्या राष्ट्रवादीत नारायण राणे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची ताकद कधीच नव्हती. नारायण राणे यांनी काँग्रेसमधला अनुभव घेतला होता. त्यामुळे ते पवारांच्या दुसऱ्याला लटकवत ठेवण्याच्या राजकारणाच्या नादी लागले नाहीत.
त्यांनी स्वाभिमानी पक्षाची वेगळी चूल मांडून पाहिली. पण एखाद दुसरी स्थानिक निवडणूक वगळता त्यांना यश मिळू शकले नाही. विधानसभा निवडणूकीत त्यांना दोनदा अपयश आले. एकदा वांद्र्यातून आणि दुसऱ्यांदा होम टर्फ सिंधुदुर्गातून.
त्यानंतर त्यांनी योग्य संधी पाहून भाजपची वाट धरली. आपल्या मुलाला कमळावर निवडून आणले. जो संयम त्यांनी काँग्रेसमध्ये असताना गमावला होता. तो संयम नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी भाजपमध्ये येऊन आत्तापर्यंत पाळला. शिवसेनेवर तुटून पडायची आणि अधून मधून राष्ट़्रवादीच्या नेत्यांशी पंगा घेण्याची राजकीय कामगिरी त्यांनी योग्य पार पाडली.
भाजपच्या कोणत्याही नेत्याविषयी कधीही गैरउद्गार काढले नाहीत. भाजपमध्ये सामील झाल्यावर संघ परिवाराविषयी गैरउद्गार काढले नाहीत. संघ परिवाराच्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत राहिले.
आता नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपदाची संधी नवी असाइनमेंट मोदींनी त्यांना दिली आहे. आता त्यांना कोकणात आणि मुंबईत राजकीय परफॉर्मन्स दाखवावा लागेल. शिवसेना – राष्ट्रवादी युतीशी लढताना त्यांचा कस लागेल. तो परफॉर्मन्स जर उत्तम राहिला तरच नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांना भाजपमध्ये भविष्यकाळातही चांगली संधी राहील, असे दिसते आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App