नाशिक : बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ राज्यकर्ता मोहम्मद युनूस आणि बांगलादेशी लष्कर प्रमुख वकार उज झमान यांच्यात गंभीर मतभेद झाल्याचे समोर आल्यानंतर मोहम्मद युनूस त्यांच्यासमोर राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नाही म्हणून त्यांनी वैतागून राजीनामाची तयारी केली, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या. त्यामध्ये अनेक ताणेबाणे गुंतल्याचे बातम्यांमध्ये नमूद केले गेले.
पण मोहम्मद युनूस आणि वकार उज झमान यांच्यातल्या खऱ्या आणि गंभीर मतभेदांच्या मुद्द्यावर फारशी चर्चाच माध्यमांमधून दिसली नाही, ती म्हणजे मोहम्मद युनूस यांना आला रोहिंग्या निर्वासितांचा पुळका म्हणून वकार उज झमान यांनी त्यांना दिला जोरदार झटका ही खरी बातमी आहे!! पण भारतातल्या आणि बांगलादेशातल्या लिबरल माध्यमांनी ही बातमी झाकून ठेवली.
पण हे तेच रोहिंग्या घुसखोर निर्वासित आहेत, जे म्यानमार मधून भारतात येऊन भारताला देखील उपद्रव देत असतात. त्यांचा उपद्रव बांगलादेशात देखील तसाच आहे, पण मोहम्मद युनूस यांना या घुसखोर रोहिंग्या निर्वासितांसाठी बांगलादेश ते म्यानमार मधला राखाईन प्रांत यादरम्यान एक सुरक्षित कॉरिडॉर बांधायचा होता जेणेकरून हे रोहिंग्या निर्वासित म्यानमार आणि बांगलादेश यांच्यामध्ये अनिर्बंध संचार करू शकतील. हा कॉरिडोर बांधण्याची योजना आणि त्याचा आराखडा मोहम्मद युनूस यांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलील उर रहमान यांनी बनवली होती. आपण फार मानवतावादी आहोत. त्यामुळे रोहिंग्या निर्वासितांसाठी मानवतावादी कॉरिडॉर बांधला, हे सगळे जगाला दाखवण्याचा मोहम्मद युनूस यांचा डाव होता. पण त्यामुळे बांगलादेशच्या सुरक्षा आणि सार्वभौमतवाला नख लावण्याची मूभा रोहिंग्या निर्वासितांना मिळणार होती. ती बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी वेळीच ओळखली आणि म्हणून कॉरिडॉर बांधण्याची योजना वकार उज झमान यांनी रद्द करून टाकली. बांगलादेशात ज्यावेळी लोकनियुक्त सरकार येईल, त्यावेळी त्या विषयाकडे बघता येईल. तोपर्यंत असला मानवतावादी कॉरिडॉर वगैरे काही बांधता येणार नाही, असे त्यांनी मोहम्मद युनूस यांना बजावले.
याचा अर्थ असा की, ज्या रोहिंग्या निर्वासितांचा उपद्रव आणि त्यांचा देशद्रोही डाव बांगलादेशी लष्कर प्रमुखाला कळला, तो आधीच्या भारतीय राज्यकर्त्यांना कळला नव्हता किंवा कळून वळला नव्हता. म्हणूनच अगदी सगळ्या देशात आणि विशेषतः दिल्ली ते जम्मू परिसरात आधीचे भारतीय राज्यकर्ते रोहिंग्या घुसखोर निर्वासितांना फुकटचे पोसत राहिले होते. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर काही प्रमाणात रोहिंग्या निर्वासितांच्या विरोधात कारवाईचा फास आवळायला सुरुवात झाली तोपर्यंत रोहिंग्या घुसखोर भारतामध्ये आपल्याच बापाचा देश असल्यासारखे वावरत होते. पण रोहिंग्या आणि बांगलादेशी यांच्यात इस्लाम हा समान धर्म असून देखील बांगलादेशी लष्कर प्रमुखाने रोहिंग्या घुसखोरांना बांगलादेशात सुरक्षित कॉरिडॉर बांधू दिला नाही, हा यातला अधोरेखित करण्याचा मुद्दा आहे.
– नोबेल विजेत्याची “बौद्धिक मस्ती” उतरवली
बाकी मोहम्मद युनूस यांच्या भोवतीचे काही सल्लागार पाकिस्तानी ISI साठी काम करत आहेत. त्यांना बांगलादेशी लष्करातले लेफ्टनंट जनरल मोहम्मद फैजूर रहमान आश्रय देत आहेत. बांगलादेशची राज्यघटना बदलून तिथले राष्ट्रपती पद रद्द करण्याचा डाव मोहम्मद युनूस यांनी आखला. पाकिस्तान सारखी राज्यघटना बनवण्याचा प्रयत्न चालवला. भारताशी वैर करून पाकिस्तानच्या गळ्यात गळे घातले. हे सगळे मुद्दे मोहम्मद युनूस आणि वकार उज जमान यांच्यात मतभेदाची दरी रुंदावणारे ठरले म्हणून वकार उज झमान यांनी मोहम्मद युनूस यांच्या अनेक योजनांना कात्री लावून त्यांची कोंडी केली. शेख हसीना यांचे लोकनियुक्त सरकार बाजूला करून बांगलादेशाची सत्ता बळकावणाऱ्या नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थतज्ञ राज्यकर्त्याची “उच्चशिक्षित बौद्धिक मस्ती” उतरवली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App