विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाइतका विरोध इतर कोणत्याही संघटनेला सहन करावा लागला नाही. मात्र स्वयंसेवकांचे समाजावरील सात्विक प्रेम आणि सेवाभाव यामुळे आज त्या विरोधाची तीव्रता कमी झाली आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. Mohan Bhagwat
संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित दोन दिवसीय संवाद कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते.
भागवत म्हणाले, “सज्जन लोकांशी मैत्री करा. जे सज्जन काम करत नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. विरोधकांनी केलेल्या चांगल्या कार्याची प्रशंसा करा. जे चुकीचे करतात त्यांच्याशी क्रूरतेऐवजी करुणा दाखवा. संघात कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन नाही, संघात सामील झाल्यावर ‘काय मिळेल’ असे विचारणाऱ्यांना आमचे उत्तर असते , काहीही मिळणार नाही, उलट जे आहे तेही गमवावे लागेल. हे धाडस असलेल्यांचेच काम आहे. तरीही आमचे स्वयंसेवक समाजासाठी काम करतात, कारण निःस्वार्थ सेवेतून मिळणारा आनंद वेगळाच असतो.”
सरसंघचालकांनी यावेळी संघावरील ऐतिहासिक विरोधालाही उजाळा दिला. “संघाची वाटचाल सदैव संकटांतूनच झाली आहे. आपल्यावरील टीका आणि आक्षेप कधी कमी झाले नाहीत, पण प्रेम, करुणा आणि समाजाशी असलेली नाळ यामुळे आज चित्र वेगळे आहे,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मोहन भागवत म्हणाले होते की, “हिंदू तो आहे जो इतरांच्या श्रद्धेचा आदर करतो. आमचा धर्म संघर्षाचा नाही तर समन्वयाचा आहे.” ते पुढे म्हणाले की, गेल्या ४० हजार वर्षांपासून अविभाजित भारतात राहणाऱ्या लोकांचा डीएनए सारखाच आहे. आपली संस्कृती एकोपा आणि सहजीवन शिकवणारी आहे.
भारताच्या जागतिक भूमिकेबाबत भागवत म्हणाले, “भारताला जगासाठी योगदान द्यावे लागेल. भारत विश्वगुरू बनण्याची वेळ आता आली आहे. समाजाने परस्परांशी ऐक्य राखले तर आपण नक्कीच जगाचे नेतृत्व करू शकतो.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App