विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Iran Israel Ceasefire १३ दिवस चाललेल्या इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धाचा शेवट डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेमुळे झाला. या संघर्षाच्या दरम्यान अनेक वेळा परिस्थिती बिघडून मोठा आंतरराष्ट्रीय युद्धाचा धोका निर्माण झाला होता. परंतु, अमेरिकेच्या हस्तक्षेपाने आणि कतरच्या मध्यस्थीने हे युद्ध थांबवण्यात यश आले. या युद्धविरामामुळे तिन्ही देशांना वेगवेगळ्या पातळ्यांवर दिलासा मिळाला असून, ही एक प्रकारे “सर्व बाजूंनी फायदेशीर” ठरलेली घटना आहे.Iran Israel Ceasefire
इराण आणि इस्त्रायलमधील संघर्षाचा मूळ केंद्रबिंदू इराणचा अणु कार्यक्रम होता. इराणवर हल्ला करण्यामागे इस्त्रायलचा उद्देश याच अणु क्षमतेला मागे टाकणे आणि भविष्यातील धोका कमी करणे हाच होता. या दृष्टीने इस्रायलने फोर्डो, नतांज आणि इस्फहानसारख्या प्रमुख अणु प्रकल्पांवर हल्ले करत इराणच्या अणु क्षमतेला गंभीर इजा पोहोचवली. अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सच्या हल्ल्यांमुळेही या ठिकाणांचा पायाभूत भाग पूर्णपणे उध्वस्त झाला. या साऱ्या हालचालींमुळे इराणचा अणु कार्यक्रम किमान काही वर्षांसाठी तरी मागे गेला हे निश्चित आहे.
या युद्धातून इस्रायलने आपली लष्करी ताकदही पुन्हा एकदा सिद्ध केली. F-35I स्टेल्थ विमानं, आयरन डोम, एरो-३ यांसारख्या अत्याधुनिक संरक्षण प्रणालींचा वापर करत त्यांनी आक्रमणच नव्हे तर बचावही प्रभावीपणे केला. तसेच, मोसादच्या गुप्त कारवायांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायली गुप्तचर संस्थेची प्रतिमा पुन्हा एकदा बळकट केली. इराणच्या आतूनच काही हल्ले केल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे मोसादचे गुप्त मिशन अधिक प्रभावी ठरले.
मात्र, युद्ध वाढत गेल्यावर इस्त्रायललाही काही मर्यादा जाणवू लागल्या. सुरुवातीला सुरक्षीत वाटणारे त्यांचे आकाश इराणच्या हायपरसोनिक मिसाईल्समुळे असुरक्षित बनले. तेल अवीव, यरुशलमसारख्या शहरांवर हल्ले झाले. अनेक नागरी ठिकाणांवर क्लस्टर बॉम्ब टाकले गेले. परिणामी, इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि नागरी जीवन विस्कळीत झाले. या टप्प्यावर इस्त्रायलसमोर दोन पर्याय होते – युद्ध चालू ठेवणे आणि अधिक धोके पत्करणे, किंवा युद्धविराम स्वीकारून देशांतर्गत स्थैर्य राखणे. त्यांनी दुसरा मार्ग निवडला.
इराणच्या दृष्टीने हे युद्धविराम आणखी महत्त्वाचे ठरले. युद्धाच्या सुरुवातीला जरी त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले तरी ‘रॅली अराउंड द फ्लॅग’ या मानसशास्त्रीय घटनेचा त्यांना फायदा झाला. म्हणजे, युद्धाच्या काळात देशातील जनता सरकारच्या बाजूने उभी राहते. इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी भावना निर्माण झाली. नागरिकांनी रॅली काढल्या, युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या अंत्ययात्रांमध्ये सहभागी झाले. यामुळे अयातुल्ला खामेनेई आणि IRGC (इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स) यांना देशांतर्गत आधार मिळाला.
पण युद्ध जसजसे पुढे सरकत गेले, तसतसे इराणचे संरक्षण अधिकच ढासळत गेले. हवाई संरक्षण पंगु झाले, अमेरिकन विमाने त्यांच्या हद्दीत सहजतेने घुसत होती. युद्ध थांबवले नसते, तर इराणला आणखी मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते. त्यांचे हवाई क्षेत्र शत्रूच्या हातात गेल्याने त्यांची प्रतिष्ठा धोक्यात आली होती. यामुळे युद्धविराम स्वीकारणे ही एक प्रकारची तातडीची गरज होती. युद्ध थांबवण्याच्या अगोदर कतरमधील अमेरिकन हवाई तळावर इराणने मिसाईल हल्ला केला. हा हल्ला फारसा प्रभावी नव्हता, पण या हल्ल्यामुळे इराणला स्वतःच्या ‘लष्करी ताकदी’चे प्रदर्शन करायची संधी मिळाली. यामुळे त्यांनी ‘तोंडराख’ केला, आणि लगेचच सीजफायरला होकार दिला.
अमेरिकेच्या बाबतीत पाहिले, तर ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेने युद्धविराम घडवून आणून एक मोठी कूटनीतिक विजय मिळवली. ट्रम्पने यापूर्वीही भारत-पाक संघर्षात मध्यस्थीचा दावा केला होता. इथेही त्यांनी आपली शांतता निर्माण करण्याची क्षमता जगासमोर सादर केली. कतरचे अमीर, इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी समन्वय साधून त्यांनी दोन्ही बाजूंना शांततेसाठी तयार केले. ही मध्यस्थी त्यांच्या आगामी राजकीय हेतूंनाही मदत करणारी ठरू शकते.
त्याच वेळी, अमेरिकेने आपल्या रणनीतीनुसार थेट दीर्घकालीन युद्धात उतरले नाही. त्यांनी हल्ले केले, इराणच्या अणुउद्योगावर मोठा आघात केला आणि लगेचच सीजफायर घडवून आणला. त्यामुळे त्यांच्या सैनिकांचा मोठ्या प्रमाणावर वापर टळला. अमेरिका अनेक वर्षांपासून इराणच्या अणु क्षमतेवर रोष व्यक्त करत होती. ‘डेथ टू अमेरिका’ असे नारे देणाऱ्या इराणला ट्रम्प प्रशासनाने निर्णायक उत्तर दिले. त्यानंतर युद्ध थांबवून अमेरिकेने आपली भूमिका अधिक प्रभावी आणि संयमित दाखवली.
शेवटी, या युद्धविरामाने संपूर्ण पश्चिम आशियात स्थिरतेचा मार्ग मोकळा केला. युद्धामुळे तेलाचे दर झपाट्याने वाढले होते. जर हे युद्ध आणखी काही आठवडे चालले असते, तर सौदी अरेबिया व युएईसारख्या देशांनी उत्पादन वाढवले नसते, आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम झाले असते. याउलट, सीजफायरने ही अस्थिरता रोखली. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा झाला.
सारांशतः, इराण-इस्त्रायल युद्धविराम हा तिन्ही देशांसाठी वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त ठरला. इस्त्रायलने इराणच्या अणुआशयांना खिळखिळे केले, इराणने आपली ताकद दाखवली आणि अंतर्गत पाठिंबा मिळवला, तर अमेरिकेने जागतिक शांततेचे नेतृत्व करत आपल्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांची पूर्तता केली. युद्ध थांबले असले तरी त्याचे धडे, रणनीती आणि परिणाम यावर भविष्यातील जगाचे राजकारण आणि सुरक्षानिती निश्चितच अवलंबून राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App