विशेष प्रतिनिधी
अमरावती : Bachchu Kadu शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत 7 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत.Bachchu Kadu
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू गत 7 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत होते. या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला होता. त्यांनी परवापासून थेट अन्नत्याग करण्याचाही इशारा दिला होता. त्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी तातडीने त्यांची भेट घेऊन त्यांना सरकार आपल्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे सांगत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी उदय सामंत यांच्या विनंतीचा मान राखत आपले अन्नत्याग उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. उद्याचे चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
2 ऑक्टोबरला थेट मंत्रालयात शिरणार
बच्चू कडू उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, सरकारने आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेत नाही, तर स्थगित करत आहोत. सरकारने आपल्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर 2 ऑक्टोबर रोजी आपण थेट मंत्रालयात शिरू. आपण सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा चकवा देऊ. सांगू नागपूरला व जाऊ मुंबईला. यांना आपण एकदा छत्रपतींचा गनिमी कावा दाखवू.
मुख्यमंत्री सध्या आम्हाला तारीख सांगण्यास तयार नाहीत. पण आम्ही त्यांना 2 ऑक्टोबरची तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल. अन्यथा आम्ही त्यांना माफ करणार नाही. आत्ता आपण हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करत आहोत. मी कार्यकर्त्यांचा अंत पाहू शकत नाही. ते माझ्याशिवाय उठण्यास तयार नाहीत. एक आज्जी तर ऐकण्यास तयारच नव्हती. सर्वच जातीधर्माच्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांचे मी आभार मानतो. हे यश आमचे नव्हे तर इथे येणाऱ्या सर्वांचे यश आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही उदय सामंत यांच्या घराबाहेर आंदोलन करू, असा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला
शेतकऱ्यांच्या मुद्यावर एकजूट व्हा
मी आता महाराष्ट्रभर दौरे करेन. हे आंदोलन अधिक मजबूत करेन. तुम्ही कोणत्याही पक्षात राहा. कोणत्याही नेत्याचा मानसन्मान करा. पण शेतकऱ्याच्या मुद्यावर एकजूट व्हा, असे आवाहनही बच्चू कडू यांनी यावेळी जनतेला केले.
मी पाणीही सोडण्याचा निर्णय घेतला होता. कारण, हे सरकार तोपर्यंत मानणार नव्हते. पण डॉक्टरांनी माझ्या लिव्हरचा प्रॉब्लेम सुरू झाल्याचे सांगितले. उद्या कदाचित दवाखान्यात भरतीही व्हावे लागेल. त्यामुळे अशा सर्व गोष्टी पाहून आपण तूर्त हे आंदोलन मागे घेत आहोत. आपण 2 ऑक्टोबरला पुन्हा नव्या दमाने हे आंदोलन सुरू करू, असे ते म्हणाले.
सरकारची बच्चू कडूंना 3 आश्वासने
शासनाने बच्चू कडू यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र देण्यात आले आहे. त्यात त्यांना खालील 3 आश्वासने देण्यात आली आहेत.
1. शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
2. दिव्यांगाच्या मानधन वाढी बाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमद्ये तरतूद करण्यात येईल.
3. उर्वरित मुद्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App