नाशिक : जातील तिथे मित्र पक्षांवरच अजितदादांच्या कुरघोड्या म्हणून भाजप आमदारांनी अमित शहांपुढे वाचला तक्रारीचा पाढा, पण अमित शाह यांनी भाजपच्या आमदारांना मोठ्या संख्याबळावर रेटून काम करवून घ्यायचा सल्ला दिला.
काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी असो, किंवा भाजप महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीने सत्तेचे तुकडे खाताना ते कधी नीट खाल्ले नाहीत. शरद पवारांनी निर्माण केलेली राष्ट्रवादी काँग्रेस नावाची प्रवृत्ती नेहमी मित्र पक्षांच्या ताटातच हात घालत राहिली. याचा त्रास काँग्रेस, शिवसेना आणि भाजपला झाला. भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन देखील अजित पवारांची काड्या घालण्याची आणि कुरघोड्या करण्याची जित्याची खोड गेली नाही. त्यांनी भाजप आमदारांच्या विरोधात हरलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बळ दिले. भाजपच्या आमदारांवर कुरघोड्या सुरू ठेवल्या. म्हणून भाजपच्या आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे अजित पवारांच्या विरोधात तक्रारी केल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तिथे उपस्थित होते.
पण अमित शाह यांनी भाजपच्या सगळ्या आमदारांना एक जालीम मंत्र त्यांना दिला. महायुतीमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे. भाजपचे आमदारांचे संख्याबळ सगळ्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुम्ही अजित पवारांच्या सकट सगळ्या मंत्र्यांच्या मागे हात धुवून लागा. त्यांच्याकडे रेटून तुमची कामे करवून घ्या. तुमच्या सगळ्या कामांचा एवढा पाठपुरावा करा की अजित पवार माझ्याकडे तुमची तक्रार घेऊन आले पाहिजेत, असे अमित शाह यांनी भाजपच्या सगळ्या आमदारांना सांगितले.
– राष्ट्रवादीचा मित्र पक्षांना नेहमीच उपद्रव
मित्र पक्षांच्या सत्तेचे तुकडे खाताना राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीने ते कधीच सरळपणे खाल्ले नाहीत. शरद पवार यांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीने नेहमीच मित्र पक्षांच्या ताटात हात घालत सत्तेचे जास्तीत जास्त तुकडे आपल्या ताटात ओढून घ्यायचा प्रयत्न केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आघाडी सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नेहमीच काँग्रेसवर कुरघोडी करायचे प्रयत्न करायचे. काँग्रेस आमदारांची महत्त्वाची कामे अडकवून ठेवायचे. राज्याचे अर्थमंत्री या नात्याने अजित पवार निधी वाटपात काँग्रेस आमदारांशी दुजाभाव करायचे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, त्यांच्या संस्था बँका यांना जास्त मदत करायचे. महाविकास आघाडीत देखील त्यांची ती सवय सुटली नव्हती. तिथे त्यांनी शिवसेना आमदारांना त्रास दिला. शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी अजित पवार यांच्या तक्रारी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या होत्या.
– फडणवीसांनीही बळ देणे अपेक्षित
भाजपने अजित पवारांना सत्तेच्या वळचणीला आणून ठेवल्यानंतर सुरुवातीला ते “शांत” राहिले. पण मित्र पक्षांच्या कामांमध्ये काड्या घालायच्या, त्यांच्या आमदारांवर कुरघोड्या करायच्या ही “पवार संस्कारित” मूळ प्रवृत्ती पुन्हा उफाळून आली. अजित पवारांनी मराठवाड्यातल्या भाजप आमदारांना त्रास द्यायला सुरुवात केली. ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना बळ द्यायला सुरुवात केली. याची दखल वेळीच या सगळ्या आमदारांनी घेतली आणि अमित शाह यांच्याकडे तक्रार केली. म्हणूनच अमित शाह यांनी भाजपच्या आमदारांना संख्याबळाचा अहवाला देऊन अजित पवार आणि अन्य मंत्र्यांकडून रेटून काम करवून घ्यायचा सल्ला दिला. अमित शाह यांनी भाजपच्या आमदारांना संख्याबळाचा बूस्टर डोस दिल्यानंतर भाजपचे आमदार त्या बुस्टर डोसचा कसा वापर करतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्या आमदारांना कितपत आणि कसे बळ देतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App