विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांनी निवृत्ती नाट्य घडवून ताबडतोब जो दक्षिण महाराष्ट्राचा दौरा केला, तो राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढविण्यापेक्षा पक्षाच्या संघटनात्मक डागडूजीचाच तो दौरा ठरला. निवृत्ती नाट्य घडविल्यानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बळ वाढीसाठी ताबडतोब प्रयत्न सुरू केले, हे पवारांना दाखविणे भाग होते. अन्यथा निवृत्ती नाट्यासंदर्भात महाराष्ट्रात आणि देशात आधीच ज्या शंका निर्माण झाल्या, त्यांनाच बळकटी आली असती. त्यामुळे आपण प्रत्यक्ष कामाला लागलो हे दाखविणे ही पवारांची राजकीय अपरिहार्यता होती. Sharad Pawar south maharashtra tour, damage control of NCP
या पार्श्वभूमीवर पवारांनी सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्हा हे दौऱ्यासाठी निवडले. ज्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आधीच भरपूर डॅमेज झाले आहे, त्याची डागडूजी करण्याचाच पवारांचा हेतू होता. त्यामुळे त्यांनी अभिजीत पाटलांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचा मफलर घालून त्यांची उमेदवारी जवळ जवळ जाहीर करून टाकली. त्यातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पहिली भाकरी फिरवली. त्यांनी सोलापूर, माळशिरस, अकलूज, बार्शी, मंगळवेढा, सांगोला आदी तालुक्यांमधल्या निवडक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पण हा पक्ष वाढीपेक्षा पक्ष संघटनेची आधी झालेले डॅमेज सावरण्याचा आणि नंतर होणारे संभाव्य डॅमेज रोखण्याचा हा प्रकार होता.
त्यानंतर पवारांनी आपला रोख सातारा जिल्ह्याकडे वळविला. सातारा जिल्ह्यात त्यांचे पुष्पवृष्टीने भव्य स्वागत करण्यात आले, तर आज ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुण्यतिथी सोहळ्यात आणि रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिले. या दोन्ही ठिकाणी अजित पवार हे त्यांच्या समावेत होते. अजित पवारांसह रयत शिक्षण संस्थेच्या देणगीदारांचा पवारांनी सत्कार केला. त्यानंतर त्यांनी कुमार केतकर यांना फुले आंबेडकर पुरस्कार प्रदान केला.
या सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण सातारा जिल्ह्यात देखील पवारांनी या दौऱ्यातून संभाव्य डॅमेज रोखण्यापेक्षा राष्ट्रवादीला फार मोठे वेगळे बळ दिले असे मानण्यास वाव नाही.
पवारांच्या निवृत्ती नाट्यानंतर त्यांच्या सर्व राजकीय हालचालींचा भर प्रामुख्याने राष्ट्रवादीचे डॅमेज कंट्रोल करण्यावरच आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत साम दाम दंड भेद या युद्धनीतीनुसार पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया उखडण्याच्या बेतात आहे. भाजपच्या महाशक्ती पुढे आपली शक्तीची मर्यादा पवारांना पक्की माहिती आहे. ही मर्यादित शक्ती वाढविणे शक्य नाही, याचीही पवारांना जाणीव आहे. त्यामुळेच ही मर्यादित शक्ती टिकवून ठेवण्यावर सध्या त्यांनी भर दिला आहे आणि त्यासाठीच त्यांनी निवृत्ती नाट्यानंतर पहिल्या दौऱ्याचे ठिकाण त्यांनी दक्षिण महाराष्ट्र निवडले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App