प्रतिनिधी
कोल्हापूर : अडीच वर्षांपूर्वी बारामतीच्या गोविंद बागेत खाल्लेला आमरस पचला नाही. विधान परिषदेची आमदारकी मिळाली नाही. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठा निर्णय घेत महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीला झटका दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये संघटनेच्या राज्यकार्यकारणी बैठकीत ही घोषणा केली. Raju Shetty’s Swabhimani Shetkari Sanghatana out of Mahavikas Aghadi
मधल्या काळात राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी राजकीय संधान साधत त्यांच्या बारामतीतल्या गोविंद बाग या निवासस्थानाला भेट दिली होती. त्यांच्याबरोबर आमरसाचे भोजन केले होते. पण तो आमरस काही राजकीय दृष्ट्या पचला नाही. पवारांनी दिलेली विधान परिषदेच्या आमदारकीची ऑफर राजू शेट्टी यांना अखेरपर्यंत फळली नाही. त्यानंतर अनेक मुद्द्यांवर राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार बरोबर खटके उडले आणि आज अखेरीस यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना विकास आघाडीतून बाहेर पडली आहे.
राजू शेट्टी यांनी याआधीच आघाडीतून बाहेर पडण्याचा सूचक इशारा दिला होता. महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सामुदायिक निर्णय होता. येत्या ५ एप्रिलला राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, या शब्दांमध्ये राजू शेट्टीं यांनी महाविकास आघाडी सोडण्याबाबत शुक्रवारी सूचक इशारा दिला होता.
राजू शेट्टी म्हणाले होते, “आघाडी सरकारचा सभागृह नेता म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करताना सूचक म्हणून माझे नाव घेतले होते. कारण त्यांना स्वाभिमानीने अनेक वर्षांपासून जपलेले नैतिक अधिष्ठान हवे होते.” स्वाभिमानीने पाठिंबा काढल्यामुळे राज्य सरकारच्या स्थैर्याला फारसा धक्का लागणार नसला, तरी आघाडीतील एक मित्रपक्ष नाराज होऊन बाहेर पडला, तर दक्षिण महाराष्ट्रातील जनमतावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मित्रपक्षांना विचारत नाहीत
आघाडी सरकारला अडीच वर्ष होत आली तरी ज्या किमान समान कार्यक्रमावर आघाडी अस्तित्वात आली त्याचे पुढे काहीच झाले नाही. नवीन धोरण राबवत असताना मित्रपक्षांना विचारले जात नाही. आघाडी सरकारचे समीक्षण करण्याची आता वेळ आली आहे, असे शेट्टी म्हणाले होते.
कोल्हापूर मध्ये भाजपचा फायदा
कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी राजू शेट्टी यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा यासाठी पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर येथे त्यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे आदींचा समावेश होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App