विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकार वरील अविश्वास ठरावाच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच खासदारांसाठी अजितनिष्ठ आणि शरदनिष्ठ या दोन्ही गटांनी परस्परविरोधी व्हिप काढले आहेत. पण आत्तापर्यंत जाहीरपणे संघर्ष टाळत आलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी “आपल्या” खासदारांना मतदानाऐवजी आयत्या वेळेला सभात्याग करण्याची “आतून” “टीप” दिली आहे का??, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. NCP issued two whips for no confidence motion voting in loksabha, but will NCP vote or choose walkout??
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास ठरावावर आज दुपारी 4.00 वाजता उत्तर दिल्यानंतर त्यावर मतदान होणार आहे. या मतदानासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिकेनुसार खासदारांना व्हिप काढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेत 5 खासदार आहेत. या 5 खासदारांसाठी अजितनिष्ठ गटाचे खासदार सुनील तटकरे आणि शरदनिष्ठ गटाचे खासदार मोहम्मद फैजल यांनी परस्पर विरोधी व्हिप काढले आहेत.
सुनील तटकरे यांनी काढलेल्या व्हिप मध्ये राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांनी सरकारच्या बाजूने आणि अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा आदेश काढल्याचे नमूद केले आहे, तर मोहम्मद फैजल यांनी काढलेल्या व्हिपमध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने आणि मोदी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा आदेश काढला आहे. एबीपी माझाने दोन्ही व्हिपचा हवाला देत या संदर्भातली बातमी दिली आहे.
सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांना हवाय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री; तर सुनील तटकरे म्हणतात देवेंद्र फडणवीस उत्तम!!
पण फक्त पाच खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने परस्पर विरोधी आदेशाचे व्हिप काढल्याने दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा आहे. पण आत्तापर्यंत शरद पवार आणि अजित पवार यांनी जाहीरपणे राजकीय वाद टाळला आहे. या दोन्ही नेत्यांनी आपला बालेकिल्ला बारामतीचा दौरा देखील केलेला नाही. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत राष्ट्रवादीतल्या काका – पुतण्यांची ही नुरा कुस्ती चालू असल्याचा समज आहे.
पण लोकसभेतील मतदानाच्या वेळी काढलेल्या व्हिप मधून ही लढाई प्रत्यक्ष लोकसभेच्या फ्लोअरवर होण्याची शक्यता आहे. शरदनिष्ठ गटाकडे सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे आणि व्हीप बजावणारे मोहम्मद फैजल हे 4 खासदार आहेत, तर अजितनिष्ठ गटाचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत. दोन्ही गटांनी बजावलेले व्हिप एकमेकांना लागू असल्याचा दोन्ही गटांचा दावा आहे किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे लोकसभा सचिवालयाला कोणी कळवलेही नाही, तसेच त्या संदर्भात अधिकृत मान्यताही नाही. ही लढाई अद्याप निवडणूक आयोगातच आहे.
पण शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते संसदेच्या पटलावर खरी लढाई करण्याचे टाळतात, याचे प्रत्यंतर दिल्ली सेवा विधेयकासंदर्भात राज्यसभेत नुकतेच आले होते. त्यावेळी मतदानासाठी राष्ट्रवादीने कोणताही व्हिप काढला नव्हता. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची खासदारकी वाचली होती. प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे उजवे हात आहेत, ही बाब येथे अधोरेखित केली पाहिजे.
पण लोकसभेत मात्र दोन्ही गटांनी व्हिप बजावला आहे. याचा अर्थ आता अजितनिष्ठ आणि शरदनिष्ठ हे दोन्ही गट लोकसभेच्या फ्लोअरवर खरा संघर्ष करणार की मध्येच “एस्केप रूट” अवलंबत सभात्याग करून दोन्ही व्हिपच्या कायद्याच्या कचाट्यातून एकमेकांचे खासदार वाचवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभेत मतदान करायचे टाळण्यासाठी सभात्यागाचा पर्याय उपलब्ध असतो. असा सभात्याग करून राष्ट्रवादीचे सर्व खासदार मतदान टाळणार का?? तसेच असा सभात्याग केला, तर सुनील तटकरे हे सभागृहात बसून सरकारच्या बाजूने मतदान करणार की ते देखील मतदान टाळणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!! कारण त्यातून राष्ट्रवादीत खरी फूट पडली आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App