प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जो माईंडगेम खेळायला सुरुवात केली आहे. त्यावरून राज्यात राजकीय जुगलबंदी रंगली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्यात भर घातली आहे. शिंदे फडणवीस सरकार पाच – सहा महिन्यांपेक्षा जास्त चालणार नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असे आवाहन शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केले आहे. तर राज्यात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.
मात्र, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार हे मोठे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. पण ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलट घडत असते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना लगावला आहे. शिवसेना-भाजप युतीचे सरकार येत्या अडीच वर्षात टिकेलच पण त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये युतीचे 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येऊन पुन्हा एकदा युतीचे सरकार महाराष्ट्रात बनेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार जे बोलतात त्याच्यापेक्षा नेहमी उलट घडते, असा टोला कालच भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला होता. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच पद्धतीचा टोला लगावला आहे.
– उद्धव ठाकरेंचे आव्हान
भाजपचा शिवसेना संपवण्याचा डाव सुरु आहे. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर आपले चुकले असेल तर जनता आपल्याला घरी बसवेल. जर ते चुकले असतील तर त्यांना घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपाने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले.
– उद्धव ठाकरे सक्रिय
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहेत. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संघटनेत चांगलेच सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे उपस्थितांना संबोधित केले. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या सरकारवर टीकास्त्र सोडले होते. महाराष्ट्रातील नवे शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App