प्रतिनिधी
मुंबई : सध्या राज्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मवीर उपाधीवरून वाद पेटला आहे. त्याचे मूळ विरोधी पक्षनेते अजित पवार आहेत. त्यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य केले होते. त्यावर अजित पवारांच्या विरोधात जागोजागी आंदोलने सुरु झाली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवार यांचे कान टोचत ‘छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते’, असे म्हटले. Ajit Pawar targets BJP, pinched journalists and sharad Pawar
आता अजित पवार यांनी भर पत्रकार परिषदेत ‘मी कुठं सांगितलं की माझ्या काकाला जाणता राजा म्हणा म्हणून’, ते म्हणत शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला हाणला. पत्रकारांनी जेव्हा अजित पवार यांना, ‘शरद पवार यांना जाणता राजा म्हणतात’, असे सांगितल्यावर अजित पवार यांनी उपरोक्त खोचक विधान केले.
भाजपचे षडयंत्र
विधानभवनातील विरोधीपक्ष नेत्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून माझ्या विरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आले. इतिहास संशोधकांनी या मुद्द्यांवर संशोधन करून वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे मांडणी करावी. खरा इतिहास समोर आणावा. लोकांच्या प्रबोधनासाठी ते उपयुक्त ठरेल. परंतु राजकीय हेतूने राज्यातील वातावरण तापवणे आणि विद्वेषाचे राजकारण करणे कदापि सहन केले जाणार नाही, असे सांगत ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे, असे अजित पवार म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या गेल्या अर्थसंकल्पात पहिल्याच पानावर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक पुणे जिल्ह्यातल्या वढू बुद्रुक आणि तुळापूर येथे करण्यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहिर केले. घोषणा करुन आम्ही थांबलो नाही तर, त्यासाठीची आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मी सातत्याने या स्मारकासाठी बैठका घेत होतो, कामाचा आढावा घेत होतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ‘छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार’ योजना आम्ही सुरु केली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने यासंबंधी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक भारतीय जनता पक्षाला मान्य नाही का ? असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला.
इतिहासाचे वाचन करूनच केले वक्तव्य
आजपर्यंत कोणत्याही महापुरुषाबद्दल मी वादग्रस्त विधान केलेले नाही. मात्र राज्यपालांसह भाजपचे पदाधिकारी सातत्याने महापुरुषांचा अवमान करत आहेत. मात्र त्याबद्दल ही मंडळी चकार शब्द काढत नाही. महाराष्ट्रातील जनता हे सर्व बघत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर करुन स्वराज्यरक्षक ही भूमिका मी मांडली. माझे इतिहासाचे वाचन आणि आकलन याच्या आधारे माझी जी भूमिका तयार झाली आहे ती मी विधानसभेत मांडली. मी इतिहासाचा संशोधक नाही त्यामुळे त्यासंदर्भात जे तपशीलवार आरोप प्रत्यारोप होताहेत त्याबाबत युक्तिवाद करणार नाही. तो विषय इतिहास संशोधकांचा, अभ्यासकांचा आहे, असेही अजित पवार म्हणाले. नव्या पिढीतील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याबाबत तपशीलवार विवेचन केले आहे. इतरही अनेकांनी भूमिका मांडल्या आहेत. यापुढेही इतिहास संशोधकांनी त्यावर चर्चा करून वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे मांडणी करत राहावे. लोकांच्या प्रबोधनासाठी ते उपयुक्तच ठरेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App