नाशिक : एकेकाळी बेरजेच्या राजकारणाचा वैचारिक मुलामा देऊन यशवंतराव चव्हाण यांना विरोधी पक्षांना फोडावे लागले होते, पण आता 2025 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने एवढे मोठे वळण घेतले आहे की, सगळे विरोधकच सत्तेच्या वळचणीला धावू लागलेत!! हा सगळा यशवंत आणि पवार “संस्कारितांच्या” कारनाम्यांचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आला.
वास्तविक सशक्त लोकशाहीमध्ये सशक्त सत्ताधारी पक्ष आणि सशक्त विरोधी पक्ष अपेक्षित आणि आवश्यक असतात. पण तसे असताना 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीचे राजकीय औचित्य संपले. आता आपण एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकास यात्रेत सामील होऊ या, असे सांगून यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीतले शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, हिंदू महासभा यांच्यातले दिग्गज नेते फोडले. त्यांना काँग्रेसमध्ये ओढून घेतले. त्यासाठी यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या विकासाची बेरजेच्या राजकारणाची तात्विक भाषा वापरली, पण प्रत्यक्षात त्यांनी काँग्रेसचे सगळे विरोधी पक्ष फोडून काँग्रेस बळकट केली. काँग्रेस बळकटीच्या निमित्ताने स्वतःची राज्यातली आणि केंद्रातली खुर्ची मजबूत करून घेतली. यशवंतरावांचे हे बेरजेचे राजकारण दीर्घकाळ टिकले कारण ते जवळपास आयुष्यभर व्यवस्थित सत्तेच्या खुर्चीवर बसून राहू शकले.
– सत्तेच्या कुंपणाकडे धाव
पण 2025 येता येता महाराष्ट्राच्या राजकारणाने बरीच वळणे आणि वळसे घेतले. या दरम्यानच्या काळात “यशवंत संस्कारित” शरद पवार आणि “पवार संस्कारित” अन्य नेते महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. पण 2014 नंतर मात्र यशवंत आणि पवार “संस्कारितांचे” सगळे चित्रच विस्कळीत झाले. यशवंतराव आणि पवार संस्कारांच्या पलीकडचे वेगळ्याच राजकीय संस्कृतीतले नेते उदयाला आले आणि भाजपने महाराष्ट्राच्या सत्तेवरची मांड पक्की करत आणली. त्यामुळे यशवंतराव आणि पवार “संस्कारितांची” राजकीय कोंडी झाली. तात्विक राजकारण बोलायचे थांबवता येत नाही आणि सत्तेची उब सोडता येत नाही, अशी त्यांची अवस्था झाली. त्यामुळे लोकशाही – बिकशाही या केवळ तात्विक गप्पा शिल्लक राहिल्या आणि “पवार संस्कारितांची” धाव पुन्हा सत्तेच्या कुंपणाकडेच गेली.
यशवंतराव निदान बेरजेच्या राजकारणाचा तात्त्विक आव आणून तरी विरोधकांना फोडत होते. पण आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अशी “तात्त्विक” फोडाफोडीची गरजच पडेनाशी झाली. कारण उरल्या सुरल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनाच स्वतःहून सत्तेची वळचण खुणावायला लागली. सत्तेशिवाय निधी नाही आणि निधी शिवाय विकास नाही आणि विकासाशिवाय आपल्याला कोणी विचारणार नाही, असे नवीन तत्वज्ञान “पवार संस्कारितांनी” उदयाला आणले. याला सध्याच्या काँग्रेस, उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांच्यातले कुणीच नेते अपवाद नाहीत. म्हणूनच पवारांचे आमदार + खासदार स्वतःहून सत्तेच्या वळचणीला जायला उत्सुक झाले. काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेचे शहरा शहरांमधले नेते भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसू लागले.
अजितदादा + बडगुजर + जाधव
अजित पवार ते सुधाकर बडगुजर आणि आता जयश्री पाटील ते भास्कर जाधव ही सत्तेच्या वळचणीच्या नव्या तत्त्वज्ञानाच्या राजकारणाची ठळक उदाहरणे ठरली. या सगळ्या नेत्यांना बेरजेचे राजकारण म्हणून भाजपने फोडले नाही, तर हे सगळे नेते आता भाजपच्या सत्तेशिवाय पर्याय नाही म्हणून स्वतःहून सत्तेच्या वळचणीला येऊन बसले. यशवंतराव ते पवार “संस्कारांनी” फार मोठे वळण घेतले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App