महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मुंबई आणि पुण्यातल्या गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये बातम्या पाहिल्या तर सत्तेवर नेमके कोण आहे??, असा सवाल मनात आल्यापासून राहत नाही. कारण या दोन दिवसांमधल्या बातम्यांच्या भडीमारा मधून 2014 पूर्वीच्या राजकीय दिवसांची आठवण ढवळून वर आली.Who is in power BJP or Congress + NCP??
2014 पूर्वी महाराष्ट्रात प्रदेशात काँग्रेस प्रणित आघाड्यांची सत्ता होती आणि त्यावेळी कोळसा, टू जी आणि आदर्श घोटाळ्यापासून ते वेगवेगळ्या भूखंड घोटाळ्यांपर्यंत त्याचबरोबर सिंचन घोटाळ्यापर्यंत आरोपांची राळ काँग्रेस प्रणित आघाडी सरकारंवर उडाली होती. त्यामध्ये भाजपचे नेते जबरदस्त आघाडी घेऊन होते. गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच केंद्रातले अरुण जेटली, सुषमा स्वराज हे त्यावेळी आरोप करण्यामध्ये आघाडीवर होते. भाजपच्या नेत्यांनी केलेले आरोप एवढे गंभीर होते की ते सगळे आरोप काँग्रेस प्रणित नेत्यांना चिकटले आणि त्याची राजकीय किंमत काँग्रेस सकट राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्र पक्षांना भोगावी लागली होती. त्यानंतर गेली दहा वर्षे तुलनेने “शांततेत” गेली. पण 2024 नंतर विशेषत: 2025 च्या उत्तरार्धात ज्या बातम्या आल्या त्यामुळे 2014 पूर्वीच्या दिवसांची आठवण झाली.
– जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात भूखंड घोटाळ्यांचे आणि जमीन विक्रीचे जे व्यवहार किंवा गैरव्यवहार बाहेर आले त्यामुळे नेमके सत्तेवर कोण आहेत??, हा सवाल समोर आला. कारण मुंबई मरीन ड्राइव्हवर भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन होत असतानाच संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून तिथल्या जमीन व्यवहार आणि गैरव्यवहार याविषयी आरोप केले. त्याचबरोबर पुण्यातल्या जैन बोर्डिंगचे व्यवहार आणि गैरव्यवहार संपूर्ण महाराष्ट्रासह देशात गाजले. त्यामध्ये मुरलीधर मोहोळ राजकीय दृष्ट्या अडकले. महाराष्ट्रात दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने ज्यांचे नवे नेतृत्व विकसित करण्यावर भाजपने “डाव” लावला, ज्यांना पहिल्याच खासदारकीच्या टर्ममध्ये केंद्रात सहकार राज्यमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद दिले, त्या मुरलीधर मोहोळ यांना अवघ्या वर्षभरात जमीन व्यवहाराच्या आरोपाला सामोरे जावे लागले. त्यांना ते आरोप फारसे “झेपले” नाहीत. जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करावा लागला. त्यामुळे ते फारच “कच्चे खिलाडी” ठरले, अशी चर्चा मुंबई आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून समोर आली.
– भाजपची प्रतिमाहानी
विशेषतः पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारात जे राजकीय आणि आर्थिक ताणेबाणे गुंतले, ते पाहता संबंधित प्रकरण अधिक वेगाने आणि राजकीय प्रगल्भतेने हाताळायला हवे होते. पण तसे घडलेले दिसले नाही. या प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांची आणि भाजप म्हणून पक्षाची प्रतिमा हानी झाल्यानंतर केंद्रातून हालचाली करून ते प्रकरण बाजूला काढावे लागले. या सगळ्यात विरोधकांचा फार मोठा फायदा झाला असे नाही, पण ज्या पद्धतीने भाजपच्याच मित्र पक्षाच्या नेत्याने भाजपला राजकीय दृष्ट्या अडचणीत आणले, ते पाहता भाजपचे पुण्यातले स्थानिक नेतृत्व फारच “कच्चे” ठरले, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून पुढे आली.
मुंबई – पुण्यातल्या या राजकारणाचा थेट परिणाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा केंद्रातल्या अति वरिष्ठ मंत्र्यांच्या प्रतिमेवर फारसा झाला नाही, कारण विरोधकांनी केलेले आरोप त्यांना चिकटले नाहीत, पण या आरोपांचा पुण्यातल्या स्थानिक राजकारणात मात्र भाजपला धक्का बसल्याशिवाय सुद्धा राहिला नाही. पण ज्या पद्धतीने जमीन व्यवहार आणि गैरव्यवहारांच्या आरोपांची राळ महाराष्ट्रात उडाली, ते पाहता राज्यात सत्तेवर काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी आहे की भाजप प्रणित महायुती सत्तेवर आहे??, हा सवाल समोर आल्यापासून राहिला नाही. कारण जमीन गैरव्यवहाराचे मुद्दे मुद्दे भाजप पेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना जास्त चिकटतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App