विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोकणातील खेड नंतर उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव मध्ये येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे तडाखेबंद भाषण केले. पण मालेगावच्या सभेत तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका. तो सहन करणार नाही, असा राहुल गांधींना उद्धव ठाकरेंनी थेट इशारा देऊन महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मधून काँग्रेसच्या एक्झिटची नांदी केली आहे!! किंबहुना महाविकास आघाडीतून काँग्रेसचा तो एक्झिट प्लॅन असू शकतो. Uddhav Thackeray’s warning to rahul Gandhi over savarkar insult issue may lead to exit of Congress from MVA
सावरकर हे शिवसेनाप्रमुखांचे दैवत
स्वातंत्र्यवीर सावरकर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेचे दैवत आहे हे सांगायला उद्धव ठाकरेंची गरज नव्हती उलट 1986 पासून शिवसेनेने हिंदुत्व स्वीकारल्यानंतर सावरकर हे शिवसेनेच्या दैवतांच्या यादीत ॲड झालेच होते. मात्र, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफीनाम्याचा विषय वारंवार लावून धरल्यामुळे सावरकर हा “पॉलिटिकल सब्जेक्ट मॅटर” राष्ट्रीय पातळीवर गेला आणि भाजपची देखील सावरकरांच्या सन्मानापाठीमागे एक प्रकारे फरफट झाली.
सावरकर मुद्द्यावर भाजपचा प्रचार नव्हता
वास्तविक पाहता स्वातंत्र्यवीर सावरकर हे भाजपसाठी अनेक महत्त्वाच्या क्रांतिकारक नेत्यांपैकी एक. त्यातही संघासाठी ते प्रातःस्मरणीय. पण भाजपने कधीच निवडणुकीच्या प्रचारात सावरकरांच्या नावाचा वापर केलेला नव्हता. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीरांच्या माफीनाम्याचा विषय वारंवार पुढे आणल्यानंतर मात्र भाजपचा नाईलाज झाला आणि सावरकरांच्या भारतरत्नचा विषय भाजपच्या महाराष्ट्र जाहीरनाम्यात आला.
राहुल गांधींचे आगीत तेल
पण 2019 मध्ये सगळे चित्र पालटले. शिवसेना – भाजप महायुतीला जनतेचा बहुमताचा कौल असून देखील उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेऊन काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून भाजपच्या हातात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले हे आयते कोलित मिळाले आणि सावरकर हा मुद्दा राहुल गांधींनी त्यामध्ये ऍड करून आगीत तेल ओतले.
महाविकास आघाडी काँग्रेससाठी ओझे
आज मालेगावात उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत आहेत. त्यांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा जरी राहुल गांधींना दिला असला तरी हा इशारा ते ऐकतीलच याची कोणीही गॅरंटी घेऊ शकत नाही. किंबहुना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही काँग्रेसने एक राजकीय अपरिहार्यता म्हणूनच स्वीकारली होती, ती सावरकरांच्या मुद्द्यावर संपुष्टात येण्याची ही शक्यता आहे!!
राहुल गांधी प्रादेशिक नेत्याचे ऐकतील?
कोणत्याही प्रादेशिक नेत्याचा कोणत्याही मुद्द्यावर कोणत्याही बड्या काँग्रेस नेत्याने ऐकल्याचा इतिहास नाही. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असले आणि शिवसेनेचे कितीही मोठे नेते असले तरी काँग्रेसच्या दृष्टीने ते महाराष्ट्रातले एक प्रादेशिक नेते आहेत. त्यामुळे जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेसची मूलभूत मतभेदाचा मुद्दा पुढे येतो त्या मुद्द्यावर राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंचे ऐकण्याची सुताराम शक्यता नाही. म्हणूनच आज जरी उद्धव ठाकरेंनी सावरकरांचा अपमान करू नका असा इशारा दिला असला तरी जर राहुल गांधींनी तो ऐकला नाही आणि भविष्यात पुन्हा एकदा सावरकरांच्या माफीनाम्याचा विषयच काढला, तर ती उद्धव ठाकरे यांची राजकीय पंचाईत तर ठरेलच पण काँग्रेससाठी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतून एक्झिट घेण्याचा तो प्लॅनही ठरू शकेल!!
काँग्रेसला स्वतःचा राजकीय कार्यक्रम हातात
सध्या तशीही राहुल गांधींच्या निलंबित खासदारकीच्या मुद्द्यावर काँग्रेस अतिशय आक्रमक आहे. काँग्रेसला स्वतःचा असा राजकीय कार्यक्रम त्यानिमित्ताने हाती आला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस आणि काही महिने काँग्रेस संघटना राहुल गांधी यांच्या भोवतीच आपले सर्व राजकीय विषय केंद्रित करून देशावर आंदोलनाची राळ उडवेल. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्याच्या सल्ल्याकडे लक्ष देण्याची काँग्रेसला गरजही भासणार नाही. त्यामुळेच सावरकरांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी जरी राहुल गांधींना इशारा दिला असला तरी तो काँग्रेससाठी मात्र महाविकास आघाडीतून एक्झिट घेण्याचा प्लॅन ठरू शकतो, असेच आजचे राजकीय चित्र आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App