(नसलेल्या) सूत्रांच्या हवाल्याने वाटेल ते व्हिडिओ बनवा; कसेही करून भाजपच्या फांद्यांना ठाकरे लटकवा!!, असला प्रकार मराठी माध्यमांच्या लिबरल पत्रकारितेतून समोर आला आहे.
मुंबईत ठाकरे झुंजले, पण पराभूत झाले. भाजप – शिवसेना युती जिंकली. पण भाजप – शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ठाकरे बंधूंपेक्षा ठाकरे आणि पवार समर्थक पत्रकारच जास्त अस्वस्थ झाले. मुंबईत कुठल्या स्थितीत भाजपचा महापौर बसणार, या खात्रीने त्यांची झोप उडाली. त्यामुळे राहुल कुलकर्णी, निखिल वागळे, प्रशांत कदम, प्रकाश अकोलकर वगैरे पत्रकारांनी वाट्टेल त्या सूत्रांच्या हवाल्याने वाट्टेल तसे व्हिडिओ बनवून भाजपच्या फांद्यांना ठाकरे लटकवायचा उद्योग केला. त्यासाठी त्यांनी नगरसेवकांच्या संख्याबळाची वाट्टेल तशी मोडतोड केली. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार केले.
भाजप एकनाथ शिंदेंना डच्चू देणार, त्यांच्या ऐवजी उद्धव ठाकरे यांना जवळ करणार, भाजपला काटशह देण्यासाठी ऑपरेशन टायगर करून म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुसऱ्यांदा फोडून एकनाथ शिंदेच भाजपला कात्रजचा घाट दाखविणार, असल्या बातम्यांच्या कल्पनांचे पतंग हवेत उडवले. उद्धव ठाकरे लवकरच भाजपा बरोबर जाणार या बातमीच्या पुष्टीसाठी मराठी माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात (न घडलेले) संभाषण सुद्धा घडल्याचे दाखविले.
वास्तविक एकनाथ शिंदे उदय सामंत आणि त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे मुंबईत शिवसेना – भाजप महायुतीचाच महापौर होईल अन्य कुणाचाही नाही, असे सांगितले होते. त्यानंतर दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांना भाजपबरोबर घेणार नाही, अशी ग्वाही दिली, तरीदेखील भाजपच्या फाद्यांना ठाकरे लटकवायचे काम माध्यमांनी आणि वर उल्लेख केलेल्या पत्रकारांनी थांबविले नाही. त्यांनी स्वतःच्याच गणितांच्या आधारे कसेही करून भाजपचा महापौर होणार नाही. तो झाला, तर भाजपचा पहिला महापौर होणार नाही, तर भाजपचा दुसरा महापौर होईल, अशा खुसपटी बातम्या दिल्या. कारण प्रभाकर पै हे भाजपचे पहिले महापौर होऊन गेलेत, अशी प्रकाश अकोलकर यांनी “ज्ञानात” भर घातली. पण त्यामुळे भाजप आणि शिंदे यांच्या युतीत काहीही फरक पडणार नाही आणि मुंबईत ठाकरेंचा किंवा अन्य कुठल्याही विरोधकांचा महापौर बसणार नाही, ही वस्तुस्थिती बदलणार नाही.
मुंबई आणि ठाणे यांच्यात महापौर पदाची अदलाबदल किंवा रस्सीखेच होईल किंबहुना ती चालू आहे, अशी मखलाशी करणाऱ्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या त्यासाठी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या वक्तव्यांचा हवाला दिला पण मुंबई ठाणे किंवा अन्य 22 महापालिकांमधल्या महापौरांचा निर्णय संजय केळकर किंवा निरंजन डावखरे हे आमदार घेणार नसून तो निर्णय फक्त देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच येणार आहेत हे राजकीय सत्य वर उल्लेख केलेल्या पत्रकारांनी आणि अन्य मराठी माध्यमांनी सांगितले नाही. त्यांनी फक्त तथाकथित दबाव तंत्राच्या बातम्या चालविण्यात आणि त्यावर व्हिडिओ करून अपलोड करण्यात धन्यता मानली.
एकीकडे भाजपच्या फांद्यांना ठाकरे लटकवायचे उद्योग सुरू असताना तिकडे दिल्लीत प्रचंड मोठी राजकीय घडामोडी घडवून भाजपने generational change घडवून आणला. नितीन नवीन यांना अध्यक्षपदी बसविले. त्यानंतर भाजपमध्ये फार मोठे संघटनात्मक बदल करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले. राष्ट्रव्यापी राजकारणाचा मोठा पट मांडायचे काम या निमित्ताने भाजपने सुरू केले. पण संपूर्ण देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या घटनेकडे मराठी माध्यमांचे पूर्ण दुर्लक्ष झाले. किंबहुना त्यांना ते दुर्लक्ष करावे लागले. कारण भाजप मधल्या अतिवरिष्ठ पातळीवरच्या घडामोडींचा मागमूस लावणे आणि त्यावर काही भाष्य करणे ही मराठी माध्यमांची आणि त्यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची लायकीच उरलेली नाही. भाजप मधल्या अतिवरिष्ठ पातळीपर्यंत, वरिष्ठ पातळीपर्यंत आणि मध्यम पातळीपर्यंत सुद्धा पोहोचण्याची यांची पात्रता उरलेली नाही. त्यामुळे खऱ्या बातम्यांच्या अभावी भाजपच्या फांद्यांना ठाकरे लटकवायचे काम करण्याखेरीस त्यांना दुसरा “उद्योग” आणि “पर्याय” उरलेला नाही. म्हणून कसेही करून नसलेल्या सूत्रांच्या हवाल्याने वाटेल ते व्हिडिओ बनवा आणि भाजपच्या फांद्यांना ठाकरे लटकवा, अशा पुड्या वर उल्लेख केलेल्या पत्रकारांना आणि मराठी माध्यमांना करावा लागतोय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App