नाशिक : एकीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे अजून आपापल्या पक्षांच्या एकी-बेकीचीच चाचपणी करताहेत, तर दुसरीकडे भाजपने संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वयाची बैठक घेऊन राज्यातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी देखील सुरू केली आहे.
महाराष्ट्रात महापालिका जिल्हा परिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वी उद्धव आणि राज हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार असे ढोल माध्यमांनी वाजविले. त्या ढोलांचा आवाज जास्त झाल्याबरोबर शरद पवारांनी दोन राष्ट्रवादींच्या एकीकरणाची “राजकीय पुडी” महाराष्ट्राच्या हवेत सोडून दिली त्यामुळे माध्यमांनी ठाकरे बंधूंच्या ऐक्याबरोबरच पवार काका – पुतण्यांच्या ऐक्याचे ढोल वाजवायला सुरुवात केली.
पण याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचे दोन मेळावे पुण्यात झाले. तिथे दोन्हीकडे एकीचा सूर आळवला गेला नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीतले नेते आणि कार्यकर्ते मात्र भांबावले. काका – पुतणे एकत्र आले तर थोडेफार ठीक चालेल, नाहीतर निवडणुकीत आपले काही खरे नाही, याची धास्ती दोन्ही राष्ट्रवादीतल्या इच्छुकांना वाटली. पण हे सगळे माध्यमांमध्ये सुरू होते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने पवार काका – पुतण्यांनी फारसे काही केले नाही. युतीचा किंवा आघाडीचा निर्णय नंतर घेऊ तुम्ही कामाला लागा असा “मौलिक संदेश” या दोघांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजप सोडून कुठल्याही पक्षाशी युती करायची तयारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दाखविली. त्यावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आम्ही कुठे पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण दिले आहे?, त्यांनी जिथे आहे तिथून लढावे. आम्ही आमच्या पद्धतीने निवडणूक लढवू, असे सांगून पवारांच्या युतीच्या चर्चांना टाचणी लावली.
राज ठाकरेंनी तर वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांना भेटायलाच नाकारले. ते आपल्या कुटुंबासह मुंबई बाहेर निघून गेले. पण याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये भेट घेऊन मोठी राजकीय राळ उडवली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या ऐक्याची चर्चा पंक्चर झाली. याबद्दल संजय राऊत यांनी सामनातून जोरदार चिडचिड आणि आदळआपट केली.
– सुरुवातीपासून समन्वय
पण काही झाले तरी ठाकरे आणि पवार यांच्या एकी-बेकीची चर्चा फक्त माध्यमांमध्येच राहिली. प्रत्यक्षात राजकीय पटावर कुठलेही प्यादे पुढे मागे सरकले नाही. त्याउलट भाजपने संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत समन्वय बैठक घेऊन निवडणुकीची तयारी करायचे पुढचे पाऊल टाकले. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. कारण त्यांचा संघाशी समन्वय नव्हता, पण विधानसभेत भाजपने ती उणीव भरून काढली. बटेंगे तो कटेंग, एक रहेंगे तो सिर्फ रहेंगे या घोषणांचा परिणाम भाजपचे कार्यकर्ते आणि संघाचे स्वयंसेवक यांनी एकत्रितरित्या समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचविला. त्यातून विधानसभेत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. आता तेच यश रिपीट करण्यासाठी संघ आणि भाजपच्या समन्वय समितीची बैठक नागपूरच्या रेशीम बागेत झाली. पण त्या बैठकीत नेमके काय ठरले याची माहिती मात्र “अतिउच्चशिक्षित” मराठी माध्यमे काढू शकली नाहीत. त्यांनी फक्त भाजप आणि संघ यांची समन्वय समितीची बैठक झाली एवढीच बातमी देण्यात धन्यता मानली. या पलीकडचे कुठलेही between the lines शोधण्यात माध्यमांना फारसे यश आले नाही.
संघ आणि भाजप यांच्या समन्वय बैठकीत वेगवेगळ्या शहरांसाठी वेगवेगळे micro planning करायचे ठरले. वेगवेगळे समाज घटक, त्यांच्या वस्ती – सोसायटी निहाय छोट्या बैठका घेणे, महिलांचे नेतृत्व केंद्रित प्रचाराचे नियोजन करणे यावर भर देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजप एकटा लढणार की महायुती म्हणून लढणार या चर्चेत आपण फारसे पडायचे नाही. ती चर्चा माध्यमांना करू द्यायची आणि संघटना बळकट करण्यासाठी ground level वर मजबुतीने काम करायचे यावरही भर दिल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App