ठाकरे बंधू आणि पवार काका पुतण्या यांना भाजपच्या वाढत्या ताकदीची भीती वाटते आहे, पण त्याहीपेक्षा दोन्हीकडच्या नेत्यांना एकत्र येण्याची जास्त धास्ती वाटते आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही वस्तुस्थिती समोर येताना दिसत आहे. Thackrey – Pawar
ठाकरे बंधू एकत्र येण्याची आणि पवार काका पुतणे यांच्या पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा महाराष्ट्रात तर खूप झाली, पण प्रत्यक्षात तशा ठोस हालचाली काही दिसल्या नाहीत. ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड कोणी पुसू शकणार नाही, वगैरे बाता राज ठाकरे यांनी जरूर मारल्या, पण हे दोन्ही ब्रँड एकत्र कधी येणार आणि आपली खरी ताकद कधी दाखविणार??, याविषयी मात्र त्यांनी मूग गिळून गप्प बसणे पसंत केले. Thackrey – Pawar
पवार काकांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाची पुडी महाराष्ट्राच्या राजकीय हवेत सोडून दिली, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी एकीकरणातला “धोका” ओळखून त्याला खोडा घातला. दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर पवारांचा पुतण्या महाराष्ट्रात आणि मुलगी केंद्रात “सेट” होईल आणि आपल्या पुढच्या राजकारणाची “वाट” लागेल हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी बरोबर ओळखले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चाच विझवून टाकली. Thackrey – Pawar
– राष्ट्रवादीचे ऐक्य नेत्यांना नको, कार्यकर्त्यांना हवे
पण पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता, दोन्ही राष्ट्रवादीच्या इच्छुकांची मात्र घालमेल वाढली आहे. भाजपच्या वाढत्या ताकदीशी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये टक्कर घ्यायची असेल, तर साहेबांना दादांची आणि दादांना साहेबांची साथ मिळाली तरच आपल्याला “बळ” मिळेल. अन्यथा आपले काही खरे नाही भाजपच्या वाढत्या ताकदीशी आपल्याला टक्कर घेता येणार नाही याची दोन्ही राष्ट्रवादीतल्या इच्छुकांना धास्ती वाटते आहे. ही खऱ्या अर्थाने दोन्हीकडच्या राष्ट्रवादींची कोंडी आहे. कारण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना आपल्या राजकीय सोयीसाठी एकीकरण नको आहे, तर खाली महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र काका – पुतण्यांचे ऐक्य हवे आहे. नेते आणि कार्यकर्त्यांच्या खेचाखेचीत राष्ट्रवादीचे ऐक्य कुचंबले आहे.
– ठाकरे बंधूंची टाळी वाजतच नाही
पण मुंबई महापालिका निवडणुकीत आपला निभाव लागायचा असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्र आले पाहिजे असे दोन्ही बंधूनाच वाटले. दोघांनी एकमेकांपुढे टाळीसाठी हात केले, पण अजून टाळी काही वाजली नाही. आमचे मन साफ आहे म्हणून आम्ही युतीसाठी हात पुढे करतो आहोत, असे सांगून आदित्य ठाकरे यांनी पुन्हा ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या चर्चेला तोंड फोडले, पण मुळात आमचे मन साफ आहे हे सांगायला आदित्य ठाकरे यांना महिनाभर का लागला??, असा सवाल त्यांना कोणी विचारला नाही. त्यामुळे त्यांनी त्या सवालाचे उत्तर दिले नाही. दोन्ही ठाकरे बंधूंचे मन साफ आहे, तर युती करण्यासाठी ते कुठल्या पंचांगात मुहूर्त बघताहेत??, हा खरा सवाल आहे.
– भाजप – शिंदे साटेलोटे
मुंबईत भाजपची ताकद वाढते आहे आणि समजा थोडीफार ताकद कमी पडली, तर ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून घेण्याची भाजपची तयारी आहे. एकनाथ शिंदेंना देखील आपली शिवसेना टिकवण्यासाठी भाजपच्या साथीची गरज आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे या दोन महापालिकांमध्ये ते भाजपशीसाठी साटेलोटे करू शकतात. अशा स्थितीत ठाकरे बंधू एकत्र आले तरच त्यांची ताकद वाढेल. किंबहुना तशी त्यांची राजकीय गरजच आहे हे ओळखून दोघांनी लवकरात लवकर एकमेकांना टाळी दिली तर ठीक, अन्यथा ये रे माझ्या मागल्या असेच पुन्हा होण्याची शक्यता आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेतून हे सत्य समोर आले आहे.
पण इथे सुद्धा एक गोम आहे. ठाकरे बंधू एक झाले, तर दोन्ही बंधूंची ताकद वाढेल हे खरे, पण मनसे आणि शिवसेना यांच्यातल्या इच्छुक उमेदवारांची इच्छा मारली जाण्याची भीती इच्छुकांनाच वाटू लागली आहे. कारण ठाकरे बंधूंची युती झाली की निवडणूक लढविण्याच्या जागांवर मर्यादा येणार आणि दोन्हीकडचे काही महत्त्वाचे पत्ते कट होणार याची धास्ती शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांना वाटत आहे. ठाकरे आणि पवार ब्रँडचे बँड त्यामुळे अजूनही बेसूरेच वाजत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App