नाशिक : ठाकरे बंधू एकत्र, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाच लावला सुरुंग!!, असला प्रकार आज मुंबईतून दिसून आला. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा मोठा गाजावाजा माध्यमांनी केला. दोन्ही बंधूंनी किमान एकत्र येऊन सहा वेळा भेटी गाठी घेतल्या. एकमेकांच्या घरी जाऊन स्नेहभोजने घेतली. त्यामुळे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये चैतन्य संचारले. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आपली राजकीय आशा आणि आकांक्षा पूर्ण होईल. आपल्याला महापालिकांमध्ये नगरसेवक, वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्ष, महापौर म्हणून काम करायची संधी मिळेल, काही जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती आपल्या ताब्यात येतील आणि भविष्यात कदाचित आपल्याला आमदारकी – खासदारकीची देखील लॉटरी लागू शकेल, असा अनेकांनी होरा बांधला. शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्या आशा पल्लवीत झाल्या. दोन्ही पक्षांचे सैनिक ठाकरे बंधू राजकीय युती कधी जाहीर करतायेत आणि निवडणुका कधी होतायेत, याकडे डोळा लावून बसले.
शिवसैनिक आणि मनसैनिकांचा घात
पण शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा दोन्ही ठाकरे बंधूंनी आज घात केला. या दोघांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाची भेट घेऊन राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच पुढे ढकलायची मागणी करून टाकली. त्यामुळे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहेत. अनेक नावे दुबार आहेत. अनेकांची नावे कापली गेलीत. हे सगळे उद्योग भाजपचे हस्तक करतात. निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करतो, वगैरे आरोपांच्या फैरी ठाकरे बंधूंनी आज पत्रकार परिषदेत झाडल्या.
पवार गैरहजर
पण या पत्रकार परिषदेला आणि त्याआधी निवडणूक आयोगाच्या आजच्या भेटीला शरद पवार मात्र आज त्यांच्याबरोबर नव्हते. काल पवार ठाकरे बंधूंच्या बरोबर तिथे गेले होते, पण आज त्यांच्या ऐवजी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड पवारांचे प्रतिनिधी म्हणून दोन्ही ठिकाणी हजर होते. ठाकरे बंधूंनी झाडलेल्या आरोपांच्या फैरींना बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार या दोन काँग्रेस नेत्यांनी सुद्धा दुजोरा दिला. गेल्या 5 वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे आणखी सहा महिने थांबले तरी बिघडणार काही नाही मतदार यादी मधले सगळे फळ दुरुस्त करा आणि मग निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी केली. त्यावर तिथे हजर असलेल्या सगळ्या नेत्यांनी माना डोलविल्या.
ठाकरे बंधूंचे ऐक्य कशासाठी??
पण या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा सवाल तयार झाला, तो म्हणजे ज्या ठाकरे बंधूंनी बऱ्याच वर्षांनी फार मोठे “बंधू ऐक्य” सगळ्या महाराष्ट्र समोर सादर केले, ते “बंधू ऐक्य” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवून महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या जिंकण्यासाठी होते, की सगळ्यात निवडणुका पुढे ढकलण्यासाठी होते??, हा सवाल मुंबईतल्या पत्रकार परिषदेत कुणी पत्रकाराने विचारला नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंना किंवा तिथे उपस्थित असलेल्या कुणालाही त्याचे उत्तर द्यावे लागले नाही. पण झालेल्या या सगळ्या प्रकारामुळे शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यामध्ये मात्र हाताशेचे वातावरण पसरल्याशिवाय राहिले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App