प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मंगळवारी, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी उद्धव गटाच्या वतीने उपस्थित राहून, सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. जी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. त्यावर बुधवारी दुपारी 3.30 वाजता सुनावणी होईल, असे न्यायालयाने सांगितले होते.Supreme Court to hear Uddhav Thackeray group’s plea today Election Commission opposes giving Shiv Sena name-symbol to Shinde group
शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले आहे. ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करणारे वकील कपिल सिब्बल यांनी मंगळवारी मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. सिब्बल म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली नाही, तर ते चिन्ह आणि बँक खाती ताब्यात घेतील. कृपया हे प्रकरण घटनापीठासमोर सूचीबद्ध करा.”
यावर, सर्वोच्च न्यायालयाने केस फाईल करणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली. निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि त्यांना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या अविभाजित शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह वाटप करण्याचे आदेश दिले.
‘सर्वोच्च न्यायालय ही आमची शेवटची आशा’
तत्पूर्वी, या वादावर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने आपल्याला न्याय दिला नसल्याचा आरोप केला होता. त्यांच्याकडून सर्व काही चोरीला गेल्याचे त्यांनी म्हटले. पक्षाचे नाव, पक्षाचे निवडणूक चिन्ह सर्वच चोरीला गेले. ते लोक ठाकरेंचे नाव चोरू शकत नाहीत, असेही ते म्हणाले होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असून या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय ही आपली शेवटची आशा आहे, असे मत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले होते.
शिंदे गटाची कॅव्हेट याचिका
विशेष म्हणजे शिवसेनेचे चिन्ह, नाव उद्धव ठाकरे यांच्याकडून हिसकावून घेतल्यानंतर एकनाथ शिंदेही स्वस्थ बसलेले नाहीत. शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवण्यासाठी ते त्याच्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलत आहेत. एक दिवसापूर्वी शिंदे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल केली होती.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी उद्धव गट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात, असे या याचिकेत म्हटले आहे. अशा परिस्थितीत याप्रकरणी कोणताही निकाल देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा युक्तिवादही ऐकून घेतला पाहिजे असे त्यात म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App