नाशिक : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज विरोधी पक्षांनी मुंबईत एकत्रित बैठक घेतली, पण महाविकास आघाडीच्या या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे फक्त शिवसेना आणि काँग्रेस या दोनच पक्षांच्या आमदारांची बैठक आज झाली. या बैठकीनंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अनिल परब, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि अमीन पटेल हे आमदार उपस्थित होते.
– महाविकास आघाडीतील फूट
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीतली मोठी फूट यानिमित्ताने समोर आली. पण भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडी फुटली नसल्याचा दावा केला. कम्युनिकेशन गॅप राहिल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले आमदार बैठकीला पोहोचू शकले नाहीत पण आम्ही सगळे एकच आहोत, असा दावाही त्यांनी केला.
पार्थच्या जमीन घोटाळ्यावर उत्तरे देताना तारांबळ
त्याचवेळी पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मात्र भास्कर जाधव यांची पंचाईत झाली. अनिल परब यांनी त्यांची बाजू सावरून धरली. पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल सरकारने विधिमंडळाच्या पटलावर ठेवलाच पाहिजे. त्यानंतरच आमची भूमिका आम्ही जाहीर करू, असे अनिल परब म्हणाले. पण भास्कर जाधव यांनी त्या पद्धतीचे उत्तर दिले नाही. जनतेच्या हितासंदर्भात जे प्रश्न असतील ते सगळे आम्ही उचलून धरू, असेच ते सांगत राहिले.
सरकारने बोलाविलेल्या चहापानावर विरोधकांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातला. पण त्याचवेळी सगळ्या विरोधकांनी लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयांच्या ऐवजी तीन हजार रुपये द्या, अशी मागणी केली.
– पवारांच्या आमदारांच्या दांडीचे खरे कारण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले दहा आमदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत ही खरी बातमी होती पण ती शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी दाबायचा प्रयत्न केला. पण म्हणून ती बातमी दबली नाही. शरद पवार सध्या आजारी असले, तरी त्यांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे डाव लपून राहिले नाहीत. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करून सत्तेचा तुकडा मिळवायचा त्यांचा प्रयत्न सगळ्यांनाच दिसून आला. त्यातही राज्यसभा निवडणूक जवळ आली असताना त्यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर आहे. अशा स्थितीत त्यांना राज्यसभेवर जायचेच असेल, तर त्यासाठी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतल्या आमदारांच्या मतांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यातल्या सरकार विरोधात कुठली भूमिका घेणे परवडणार नाही, म्हणून त्यांच्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला दांडी मारली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App