नाशिक : सशक्त लोकशाहीत संवाद साधण्याखेरीज सुप्रिया सुळे दुसरे करणार तरी काय??, असा सवाल त्यांच्याच एका वक्तव्यामुळे समोर आलाय.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येण्याची चर्चा सुरू झाली. परंतु सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून ती चर्चा फेटाळून लावली.
– सुप्रिया सुळेंचा विरोधकांशी संवाद
त्याचवेळी सुप्रिया सुळे यांनी आपण विनोद तावडे यांना 21 वेळा भेटलो म्हणजे आमची युती होणार, असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही संसदीय कामकाजासाठी आणि देशाची धोरणे ठरविण्यासाठी एकत्र भेटतो. त्यामध्ये भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असा विचार नसतो. देशहिताचा विचार असतो. यशवंतराव चव्हाणांचे आमच्यावर संस्कार आहेत. लोकशाहीमध्ये विरोधक हा आपला शत्रू नसतो. सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकांशी संवाद साधायचा असतो, तसा आमचा सर्वांशी संवाद होतो, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. त्यांनी भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस युती होण्याची शक्यता फेटाळून लावली.
– दुसरे करणार तरी काय??
अर्थातच सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्या सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकांची संवाद साधण्याशिवाय दुसरे करणार तरी काय??, असा सवाल या निमित्ताने समोर आला.
कारण तिकडे नवी दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची आणि त्यांना सत्तेबरोबर घ्यायची शक्यता स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावली.
– फडणवीसांनी मारली पाचर
आता ज्या अर्थी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मुख्यमंत्री शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडणारही नाहीत आणि त्यांच्या अखंड पक्षाला सत्तेबरोबर घेणारे नाहीत, असे सांगतात, त्यावेळी सुप्रिया सुळे असोत, रोहित पवार असोत किंवा जयंत पाटील असोत, त्यांच्यासारखे यशवंतराव चव्हाण यांचे “संस्कार” झालेले नेते विरोधकांशी सशक्त लोकशाहीमध्ये संवाद साधण्यासाठी दुसरे करणार तरी काय??, हा सवाल उत्पन्न होतो आणि दुसरे काही करता येणार नाही, हे त्याचे उत्तरही अधोरेखित होते.
– “तत्त्वज्ञानाचे डोस”
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या शिवाय राहू शकत नाही. कारण यशवंतराव आणि पवार या दोघांचेही आपापल्या अनुयायांवर संघर्षापेक्षा सत्तेचे संस्कार आहेत, हे सांगायला फार मोठ्या राजकीय अभ्यासाची गरज नाही. संघर्षापेक्षा सत्ता हवी आणि सत्तेतून पैसा हवा हे तत्त्वज्ञान यशवंतराव आणि पवारांनी आपल्या अनुयायांच्या मनावर कोरून ठेवले. त्यामुळेच सत्ता गेल्यानंतर पाण्याविनाय माशासारखी त्यांच्या अनुयायांची अवस्था झाली असल्यास नवल नाही. त्यातूनच मग सत्तेच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी भेटीगाठी होतात. वाटाघाटी होतात. पण जोपर्यंत सत्ताधारी पक्षाला त्यांची गरजच वाटत नाही, तोपर्यंत यशवंतराव आणि पवारांच्या अनुयायांची सत्तेची तहान भागली जात नाही म्हणून मग “तत्त्वज्ञानाचे डोस” प्यावे लागतात आणि समोरच्याला पाजावे लागतात. यातूनच सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य आले, “सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांची संवाद साधावा लागतो. तो आम्ही साधतो!!” यापेक्षा सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यात दुसरा कुठलाही अर्थ नाही. कारण भाजप त्यांना आज तरी आणि नजीकच्या भविष्यात तरी सत्तेच्या जवळ घ्यायला तयार नाही. काँग्रेसकडून सुद्धा विलीनीकरणाचा अधिकृत कुठला प्रस्ताव यायला तयार नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवार आणि त्याहीपेक्षा शरद पवार यांची राजकीय अवस्था लटकलेल्या त्रिशंकू सारखी झाली आहे. फक्त ती कबूल करायची “पवार बुद्धीच्या” पत्रकारांची आणि खुद्द पवारांची आणि त्यांच्या अनुयायांची तयारी नाही, एवढेच काय ते सत्य आहे!!
Sharad Pawar NCP has no chance of getting near of BJP’s power
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस NDA मध्ये सामील करून घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नकार!!
- महाराष्ट्रात 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट; पुढील 10 दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता!!
- प्रियांका गांधींचा मतदारसंघ वायनाडमध्ये पुन्हा एकदा भूस्खलन; प्रियांका गांधींचे दिल्लीतून ट्विट!!
- UK Election : ब्रिटनमध्ये परदेशी निधीवर नियंत्रण:निवडणूक उमेदवारांना प्रत्येक मोठ्या देणगीचा स्रोत सांगावा लागेल