विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : महाराष्ट्रात स्वराज्य नावाचा पक्ष स्थापन करून महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देण्याचे मनसुबे रचणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्याऐवजी त्यांनी कोल्हापुरात त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांचेच काम करायचा निर्णय घेतला आहे. Sambhaji raje blackout of loksabha elections in support of his father shahu maharaj
छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरातून लोकसभेच्या रिंगणात उतरतील, अशी गेले काही दिवस चर्चा होती. अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब झालेले आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांना उमेदवार म्हणून शाहू महाराजच हवेत. त्यामुळे कोणत्या पक्षातून लढायचे एवढाच निर्णय व्हायचा आहे शाहू महाराज तो निर्णय स्वतःच घेणार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण घराणे कष्ट करेल, असे संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
कोल्हापूर मतदारसंघावर संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी सध्या स्वराज्य पक्षाची संकल्पना बाजूला ठेवून पूर्णपणे शाहू महाराजांचेच काम करावे लागेल आणि ते काम आपण आणि मालोजीराजे करू, असा निर्वाळा संभाजीराजे यांनी दिला.
संभाजीराजे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून उतरायचे मी ठरवले होते. कोल्हापूर की नाशिक एवढाच माझा निर्णय बाकी होता, पण ज्यावेळी आमच्या बाबांचे (शाहू महाराज) कोल्हापूरची निवडणूक लढविण्याचे ठरले, त्यावेळी त्यांना आमचा पाठिंबा असल्याचं मी सांगितलं. त्यांनी निवडणूक लढावी असा लोकांचा आग्रह होता तसेच त्यांचीही इच्छा होती. माझे वडील, मोठे महाराज माझ्यासाठी सर्वस्व आहेत. म्हणून मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलंय, मी जर निवडणूक लढवली असती तर आपण विजयासाठी 100 % प्रयत्न केले असते, पण आज महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्या विजयासाठी 1000 % प्रयत्न करू. शाहू महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा अनुभव कोल्हापूरला नेहमी पुरोगामी दिशा दाखवेल, यात शंका नाही.
शाहू महाराज काँग्रेस, शिवसेना की राष्ट्रवादी पक्षाकडून लढणार??, हा कळीचा प्रश्न संभाजीराजेंना पत्रकारांनी विचारला. त्यावर ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे मी कसे सांगू, त्यांची भूमिका मी कशी मांडणार??, असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना केला. महाविकास आघाडीतील सगळ्या पक्षांना महाराजच पाहिजेत, असे वातावरण आहे. जो काही निर्णय महाराज घेतील, त्यांच्यासोबत मी स्वत: असणार आहे, शेवटपर्यंत आम्ही त्यांना साथ देऊ, अशी ग्वाही संभाजीराजेंनी दिली.
निवडणुकीकरिता वेळ कमी आहे, रणनीती कशी असेल??, असा सवाल पत्रकारांनी केल्यावर ते म्हणाले, निवडणुकीसाठी काहीच अडचण येणार नाही. वेळोवेळी मोठ्या महाराजांचा सगळ्यांशी संपर्क आहे. माझा आणि मालोजीराजेंचा देखील संपर्क आहे. पण एकदा ठरले की निवडणुकीपर्यंत सगळे काही व्यवस्थित होईल. कष्ट करण्यामध्ये आम्ही कुणीही मागे पडणार नाही, मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय, अगदी घरदाराचं तोंडही मी पाहत नाही. महाराष्ट्रात फिरतोय, लोकांशी संवाद साधतोय. निवडणूक काळातही तेच करू.
2009 च्या निवडणुकीत आपला कोल्हापूर मतदारसंघात पराभव झाला होता. मात्र त्या पराभवापासून भरपूर काही शिकायला मिळाले. अनुभव मिळाले. त्या अनुभवाच्या आधारेच शाहू महाराजांसाठी काम करून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू, असे संभाजी राजे यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App