विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ranvir Shorey मीरा रोड परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये मराठी न बोलल्याच्या कारणावरून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अमराठी दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावरून बॉलिवूड अभिनेते रणवीर शौरी यांनी राक्षस मोकाट फिरत आहेत म्हणत मनसेवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केला आहे.Ranvir Shorey
मीरा रोड येथील एका रेस्टॉरंटमध्ये मनसेचे कार्यकर्ते गेले असता, तेथील मालक हिंदीत बोलत होता. त्यावर कार्यकर्त्यांनी त्याला “हा महाराष्ट्र आहे, येथे मराठीतच बोलावं लागतं” म्हणत हिंदीतच बजावलं आणि त्याला मारहाण केली.
या घटनेचा व्हिडीओ एका स्थानिक नागरिकाने शूट करून सोशल मीडियावर टाकला. त्यामध्ये रेस्टॉरंट मालक स्पष्टपणे म्हणताना दिसतो की, “मराठी शिकण्याची मला तयारी आहे, कोणी शिकवलं तर मी बोलेन.” मात्र तरीही मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्यावर आक्रमक पवित्रा घेत, त्याला ढकललं, मारहाण केली.
रणवीर शौरीने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत ट्विटर (X) वर लिहिले आहे की हे घृणास्पद आहे. राक्षस मोकाट फिरत आहेत. ते केवळ राजकीय फायद्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी असं करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की या घटनेची गंभीर दखल घ्यावी.”
या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. काहींनी रणवीरचे समर्थन केले, तर काहींनी त्याच्यावर टीका करत विचारले की, तू महाराष्ट्रात किती वर्षांपासून राहतोस? तू मराठी शिकण्याचा प्रयत्न का केला नाही? यावर उत्तर देताना रणवीरने लिहिलं आहे की मी द्वेष पसरवणाऱ्या अनोळखी लोकांना उत्तर देत नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की लोकांना मारहाण करून भाषा शिकवता येते, तर तुमचं विचारच चूक आहे. तुमचं लक्ष वेधण्याचे रचनात्मक मार्ग निवडा. कुणी तरी आपली उपजीविका करत असलेल्या व्यक्तीला मारहाण करणं हा मार्ग नाही.”
या घटनेमुळे पुन्हा एकदा मराठी सक्तीच्या मुद्द्यावर वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला भाषेची अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतो. मुंबईसारख्या महानगरात विविध राज्यांतील नागरिक उदरनिर्वाहासाठी येतात, त्यामुळे सहिष्णुता आणि समावेशकता ही मुंबईची ओळख राहिली आहे. अशा वेळी अशा घटनांमुळे त्या शहराच्या सामाजिक एकतेला तडा जाण्याचा धोका असतो, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App