प्रतिनिधी
खामगाव : राज्यातील सर्व शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात त्या 350 वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर झाले आहे. रविवार, 23 एप्रिलला सकाळी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पुंजाजी महाराज व शारंगधर महाराज यांनी घटमांडणीचे भविष्य वर्तवले. यानुसार देशाचा राजा कायम असून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताण निर्माण होईल तसेच आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण राहील, तर घुसखोरी, रोगराई वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे.Predictions of Bhendval Constitution: The king will remain, but the threat of pestilence
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात आली. या घटामध्ये गहू, ज्वारी, तूर ,उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, बाजरी, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर आणि करडी असे 18 प्रकारचे धान्य ठेवण्यात आले. मध्यभागी चार मातीची ढेकळे ठेवून त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात आली होती.
घागरीवर पानसुपारी, पुरी, पापड, सांडोळी, कुरडई, भजे, वडे हे खाद्यपदार्थ ठेवले गेले. रात्रभर या ठिकाणी कोणीही नागरिक जात नाही. आज रविवारी सकाळी या धान्याच्या झालेल्या बदलावरून आणि घटाच्या आतील धान्याचे सूक्ष्म निरीक्षण करून सारंगधर महाराज व पुंजाजी महाराज यांनी पिकाचा आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला.
भाकितानुसार पावसाचा असा आहे अंदाज
चार ढेकळे वर ठेवलेल्या घागरीत भरपूर पाणी असल्यामुळे यावर्षी पावसाळा साधारण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पहिल्या जून महिन्यात पावसाळा कमी आहे, कुठे पाणी कमी तर कुठे जास्त पडेल. त्यामुळे सार्वत्रिक पेरणी होणार नाही. तर जुलै महिन्यात पावसाळा साधारण राहील. ऑगस्ट महिन्यात जास्त पाऊस होईल तर शेवटच्या सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस येईल. परंतु अवकाळी पाऊस राहील. त्यामुळे पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे, असेही भाकीत सारंगधर महाराज यांनी सांगितले.
पिकांची वार्षिक परिस्थिती
यावर्षी कपाशीचे पीक सर्वसाधारण येईल. तूर पीक चांगले येईल, ज्वारीचे पीकसुद्धा चांगले आहे व भावातही तेजी राहील. मूग, उडीद पीक साधारण आहे. बाजरी चांगली परंतु नासाडी होईल. भादली पीक सर्वत्र विखुरलेले दिसले. भादली हे रोगराईचे प्रतीक असल्याने सर्व जगावर रोगराईच संकट ओढवेल. गव्हाचे पीक चांगले येईल व भावात तेजी, हरभरा पीक साधारण येईल. तांदूळ पीक चांगले व भावात तेजी, बाजरी पीक साधारण, पण नासाडी होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला.
देशाचा राजा कायम राहणार
घटमांडणीतील पानविळा कायम असल्याने राजा कायम आहे. अंबाडी हे पीक आत-बाहेर आहे. अंबाडी आपले कुलदैवत असल्याने देशावर प्रकोप आहे. त्यामुळे रोगराईचे संकट येईल, मसूर पीक आत बाहेर असल्याने देशात घुसखोरी होईल. पुरी गायब असल्याने देशासहित जगावर रोगराई संकट आहे.
करडी पीक चांगले असल्याने देशाचे संरक्षण खाते मजबूत राहील, संरक्षण खात्याला परकीय घुसखोरीला सामना करावा लागेल, त्यामुळे देशाची परिस्थिती व राजासुद्धा तणावाखाली राहील. यावर्षी घटामध्ये करंजी आहे. करंजी हे आर्थिक परिस्थितीचे प्रतीक असल्यामुळे या वर्षी आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण राहील. अवघ्या राज्यभरातील शेतकरी वर्ग या मांडणीचे भाकीत ऐकून पीक पेरणी करत असतात, त्यामुळे घटमांडणीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App