नाशिक : सत्तेच्या तुकड्यासाठी “पवार संस्कारितांची” तडफड; पण नको ते ऐक्य म्हणून अजितदादांच्याच दोन नेत्यांची धडपड, त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मिळणारी संभाव्य संधी धूसर!!, असे राजकीय चित्र आज समोर आले.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसलेल्या अजितदादांच्या सत्तेतला तुकडा तोडून मिळावा म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांची धडपड सुरू असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. त्यात जयंत पाटलांचे नाव आघाडीवर ठेवले, त्या पाठोपाठ जयंत पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या तरुण आमदारांची फळी उभी राहिल्या त्या बातम्या समोर आल्या. जयंत पाटलांच्या विरोधात पवारांच्या उरल्या सुरल्या राष्ट्रवादीतल्या तरुण आमदारांनी तक्रारी केल्या. जयंत पाटील राष्ट्रवादी स्वतःच्याच समर्थकांना वेगळी वेगळी पदे देतात आणि बाकीच्या नेत्यांना डावलतात अशी तक्रार आमदारांनी शरद पवारांकडे केल्याची बातमी मराठी माध्यमांनी दिली.
त्याचवेळी सुप्रिया सुळेंना खासदारांच्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व देऊन भाजपने राष्ट्रवादीमध्ये काडी टाकून ठेवली. केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी द्यायची, तर सुरुवातीपासून प्रफुल्ल पटेल यांचे नाव आघाडीवर होते. त्यात सुप्रिया सुळे यांच्या नावाची भर पडल्याने प्रफुल्ल पटेल अस्वस्थ होऊन त्यांनी राष्ट्रवादीच्या ऐक्याला विरोध केल्याची बातमी समोर आली. प्रफुल्ल पटेल यांना मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री व्हायचे आहे. राज्यमंत्रीपदावर त्यांचे समाधान होणार नसल्याने त्यांनी आधीच ते नाकारून आपला दरवाजा बंद करून टाकला. पण राष्ट्रवादीचे ऐक्य झाले, तर मोदी अर्थातच प्रफुल्ल पटेल यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे यांनाच प्राधान्य देतील, ही शक्यता निर्माण झाल्याबरोबर प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या ऐक्यालाच विरोध करायला सुरुवात केली. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या संभाव्य संधीवर मळभ आले.
राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या चर्चेने सुनील तटकरेंची पण पंचाईत करून ठेवली. कारण दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या, तर त्यांच्या प्रदेश अध्यक्ष पदावर गदा येण्याची निश्चिती झाली. प्रदेश अध्यक्षपदाच्या स्पर्धेत तरी आपल्याला कुठला समोरचा स्पर्धक नको असे वाटायला लागल्यानंतर सुनील तटकरेंनी एकीकरणाच्या चर्चेला विरोध सुरू केला.
राऊतांनी ओळखली सत्तेची हाव
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या अस्वस्थतेवर नेमकेपणाने बोट ठेवले. मोदी आणि शाह यांच्या मोठ्या दुकानांबरोबर पवारांना स्वतःचे छोटे दुकान चालवायचे आहे म्हणून त्यांच्यात भांडण सुरू झाले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीच राष्ट्रवादीच्या ऐक्याला विरोध दर्शवला, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. एरवी संजय राऊत यांच्या कुठल्याही राजकीय युक्तिवादात कुठले तथ्य नसले तरी “पवार संस्कारितांची” सत्तेची हाव मात्र त्यांनी बरोबर ओळखली.
पवारांनीच सोडली पुडी
कारण मूळात राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर खुद्द शरद पवारांनीच काडी टाकून सुरू केली होती. अजित पवारांच्या सत्तेच्या तुकड्यात वाटा मिळावा म्हणून आपल्या राष्ट्रवादीतले नेते फुटतील. ते आधी फुटून अजित पवारांबरोबर निघून गेले, तर त्यात सुप्रिया सुळे यांचा उरला सुरला “चान्स” देखील संपून जाईल, याची भीती पवारांना वाटली म्हणूनच त्यांनी एकीकरणाची पुडी सोडून दिली. त्यानंतर राष्ट्रवादीतल्या महाभारताला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App