विशेष प्रतिनिधी
नागपूर : Nagpur SBL नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भयंकर स्फोट झाला आहे. त्यात 17 कामगार ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.Nagpur SBL
यासंबंधीच्या माहितीनुसार, राऊळगाव लगतच्या येनवरा गावात एसबीएल एनर्जीचा प्रकल्प आहे. या ठिकाणी डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स, सिजमिक एक्सप्लोसिव्ह्सचे उत्पादन होते. त्यातीलच एका युनिटमध्ये आज सकाळी 7 च्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्यात 17 जण ठार झालेत. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याची पुष्टी केली आहे. जखमींची नेमकी माहिती हाती यायची आहे. ही घटना घडली तेव्हा एसबीएलच्या विविध युनिटमध्ये 30 हून अधिक कर्मचारी काम करत होते. त्यामुळे मृत्त व जखमींचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे.Nagpur SBL
जखमींना उपचारासाठी नागपूरला हलवले
दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्फोटानंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिस, स्थानिक प्रशासन व कंपनीचे बचाव पथक घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे. या ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकल्याची भीती आहे. त्यामुळे या घटनेत नेमकी किती प्राणहानी झाली याचा निश्चित आकडा समोर आला नाही. जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे.
डिटोनेटर तयार करताना झाला स्फोट?
कळमेश्वर (नागपूर) येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) ही एक प्रमुख औद्योगिक स्फोटके बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटके, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादने तयार करते. ही कंपनी एकाच व्यवस्थापनाखाली कार्यरत आहे. सकाळी कामगार कामावर रुजू झाले असताना डिटोनेटर बनवण्याच्या प्रक्रियेत अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आला.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
भीषण स्फोटामुळे राऊळगाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्रामस्थ घटनास्थळी जमले होते. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. जखमी कामगारांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाकडे धाव घेतली असून त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा सुरू आहे. घटनेमुळे काटोल तालुका हादरला असून स्फोटक कारखान्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेवर शोक व्यक्त करताना म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला शोक
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत या दुर्घटनेतील मृत्यूचा आकडा 17 वर गेल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे एस बी एल इंडस्ट्रियल एक्सप्लोसिव्ह मॅन्युफॅक्चरर कंपनीत झालेल्या स्फोटाची घटना अत्यंत हृदयद्रावक व दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
एनडीआरएफ व एसडीआरएफची बचाव पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महसूल विभागाचे संबंधित अधिकारी, अग्निशामक दल व रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी उपस्थित आहेत. मी स्वतः सर्व यंत्रणांच्या सातत्याने संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
या घटनेची सखोल चौकशी करण्याचे सक्त निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. या दुर्घटनेतील मृत नागरिकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे त्यांनी म्हटले आहे.
कंपनीचे सुरक्षा ऑडिट होते की नाही? – वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या कंपनीचे सुरक्षा ऑडिट होते की नाही? असा सवाल उपस्थित करत कंपनीच्या संचलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, नागपूर मधील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत भीषण स्फोट होऊन 17 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना त्वरित उपचार मिळावे. तसेच मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना सरकारने भरीव आर्थिक मदत केली पाहिजे. वारंवार या स्फोटाच्या घटना होऊन कामगारांच्या जीवावर बेतत आहे. या कंपनीच्या सुरक्षा ऑडिट होते की नाही? यासाठी जबाबदार लोकांवर कारवाई होणार की नाही??या भीषण अपघातात मृत पावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App