विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असतानाच, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कोणत्याही राजकीय आघाडीला पाठिंबा दिला नसल्याचे जाहीर केले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाविकास आघाडी किंवा महायुती यांपैकी कोणाचीही बाजू घेतलेली नाही, असे स्पष्ट करत त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, माझ्या नावाने कोणी पाठिंब्याचे पत्रक प्रसिद्ध करत असेल, तर त्यावर समाजाने विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत त्यांनी मतदानाच्या तोंडावर होणाऱ्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.Manoj Jarange
मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा कुणालाही पाठिंबा नाही. माझे जूने व्हिडिओ कोणी व्हायरल करत असतील तर ते चूकीचे आहे. माझ्या नावाने कुणी पत्रके प्रसिद्ध करत असतील तर त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. जर कुणी स्थानिक पातळीवर पिठींबा दिला असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत विषय असेल त्याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.Manoj Jarange
मराठा आरक्षणाला विरोध करणारे ते जर कोणी उभे असतील त्यांना मात्र मराठा समाजाने सहकार्य करू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ते लोक मराठा समाजाच्या लेकरांच्या मुळावर उठलेले आहेत, ते लक्षात घ्यावे. मुंबईसह, महाराष्ट्रात कोणाला पाठिंबा दिलेला नाही, हे लक्षात घ्यावे. महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. मुंबई असो की महाराष्ट्रातील इतर महापालिका निवडणुकीत कोणाला पाठिंबा दिलेला नाही. चळवळीत असणाऱ्या पोरांवर सर्वांनी लक्ष ठेवले पाहिजे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी ‘महासंग्राम’
दरम्यान, राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 15) मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत असून एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदारांकरिता एकूण 39 हजार 92 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात एकूण 15 हजार 908 इतके उमेदवार आहेत. तसेच पुरेशा पोलिस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा दि. 15 डिसेंबर 2025 रोजी केली होती. त्यानुसार बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई- विरार, कोल्हापूर, कल्याण- डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर, नांदेड- वाघाळा, सांगली- मीरज, कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App