विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून, मुंबईत मंत्रालयावर थेट धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 27 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. दोन दिवसांत मुंबई गाठून 29 ऑगस्ट रोजी तेथे शांततेत आंदोलन होणार आहे. रविवारी आंतरवालीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा केली.Manoj Jarange
मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज आंतरवाली सराटीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा आंदोलक उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाची रुपरेषा जाहीर केली. मराठा आरक्षणासाठी आता वाशीबिशी काही नाही तर, थेट मंत्रालय गाठायचे असल्याचे ते म्हणाले. मनोज जरांगेंनी सरकारकडे मराठा कुणबी एक असल्याचा जीआर काढण्यासह सात मागण्या केल्या आहेत.
नेमके काय म्हणाले मनोज जरांगे?
तुम्हा सगळ्यांना मानावे लागेल. आपल्याला सतत नावे ठेवली गेली, फूट पाडण्याचे प्रयत्न केले. पण, तुम्ही कोणी फुटला नाहीत. आता आपल्याला रणभूमीत लढायचे असून विजयही मिळवायचा आहे. रणभूमीची अशी तयारी करा की, विजय आपल्याला मिळवायचा आहे. आपल्याला कोणी थांबवू शकत नाही, असे जरांगे यांनी म्हटले. आपल्याला मैदान गाजवायचे असून गुलाल पण आपल्याच अंगावर घ्यायचा आहे. दोन वर्षांपासून मराठा आंदोलनासाठी लढत आहे. ही अंतिम लढाई मराठ्यांनी पार करायची, असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले.
एकाही मराठ्याला काठी लागली तर… जरांगेंचा इशारा
फडणवीसांचे आम्ही शत्रू नाही. पण, मराठा आरक्षणासाठी सरकारला दोन वर्षांचा वेळ दिला. आता आमच्यातील संयम संपला आहे. आता ओबीसीमधूनच आरक्षण घेणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. आता वाशी बिशी नाही, सरळ मुंबईत जायचे. मुंबईत शांततेत आंदोलन होणार असून एकाही मराठ्याला काठी लागली, तर मुंबईतील रस्ते सुद्धा मोकळे राहणार नाहीत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
आता अशी संधी पुन्हा मिळणार नाही
आता विषय हक्काचा आहे. 58 लाख नोंदी आणि 4 कोटी मराठे आरक्षणात गेले आहेत. गावागावातून तयारी करा, 29 ऑगस्टला मुंबईला जायचे असून 27 ऑगस्ट रोजी आंतरवालीतून निघायचे आहे. पावसाचे दिवस असून मला तुम्ही मुंबईत सोडायला या, पुढचे मी पाहतो. आता अशी संधी पुन्हा मिळणार नसून विजयाची चाहूल लागली आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App