विशेष प्रतिनिधी
नागपूर : Controversial statement by Sunil Kedar : काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते सुनील केदार यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यासह राजकीय वातावरण तापवले आहे. काँग्रेसच्या ‘व्होटचोर, गद्दी छोड’ आंदोलनात बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार हल्ला चढवला. “भाजपचे नेते माजले आहेत, तर अधिकारी त्यांचे गुलाम बनले आहेत. पण घाबरू नका, तो दिवस आता दूर नाही. आम्ही भाजपच्या नेत्यांना तुमच्या दारात उभे करू आणि गुलामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस वाले व सर्वांना तुमच्यासमोर मुजरा करायला लावतो.” असे आक्षेपार्ह वक्तव्य केदार यांनी केले. त्यांनी पुढे ठणकावून सांगितले की, “२०२६ पर्यंत आम्ही भाजपला धडा शिकवू, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.” यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना ‘डरो मताचा’ कानमंत्रही दिला.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्यासह विदर्भातील अनेक काँग्रेस आमदार आणि खासदार उपस्थित होते. या नेत्यांनीही भाजपवर आक्रमक टीका करताना केंद्रात लवकरच मध्यावधी निवडणुका होण्याचा दावा केला आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला, तर सुनील केदार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत आगपाखड केली. “जोपर्यंत आम्ही या माजलेल्या आमदारांना आणि गुलामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवत नाही, तोपर्यंत मी सुनील केदार नाव सांगणार नाही,” असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
केदार यांचा वादग्रस्त इतिहास सुनील केदार यांचा वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहास नवा नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा आपल्या आक्षेपार्ह विधानांमुळे चर्चा रंगवली आहे. विशेषतः, २०२२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित १५० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणात त्यांना अटकही झाली होती, आणि त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. या घोटाळ्यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा डागाळली होती, तरीही ते काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले आणि त्यांच्या आक्रमक शैलीत कोणताही बदल झालेला नाही. त्यांच्या या ताज्या वक्तव्यमुळे नागपुरात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
नवा वाद पेटण्याची शक्यता केदार यांच्या या वक्तव्याने नागपुरातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. त्यांच्या या आक्षेपार्ह विधानांमुळे भाजप आणि काँग्रेसमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांनी यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी येणाऱ्या काळात यावरून जोरदार राजकीय चिखलफेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. केदार यांनी अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना लक्ष्य केल्याने प्रशासकीय वर्तुळातही अस्वस्थता पसरली आहे. नागपुरातील हा नवा वाद आता कशा पद्धतीने पुढे जाईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, सुनील केदार यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त स्वभावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App