विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीत मूळापासूनच आणि विशेषतः पहिली संभाजीनगरची वज्रमूठ सभा झाल्यानंतर ज्या घडामोडी घडत आहेत, त्यातून महाराष्ट्रात सत्ताधारी शिवसेना – भाजप युतीशी टक्कर घेताना दुरंगी ऐवजी तिरंगी लढाईचीच तयारी चालवल्याचे दिसत आहे.Major cracks appearing in MVA through their political movements and manoeuvring
महाविकास आघाडीचे घटक पक्ष ज्या तीव्रतेने शिवसेना आणि भाजपशी लढण्याची भाषा उघडपणे बोलत आहेत, त्या तीव्रतेने नसले तरी सौम्य प्रमाणात का होईना, पण महाविकास आघाडीत अंतर्गत अस्वस्थ आहे. त्याचेच प्रतिबिंब संभाजीनगरच्या पहिल्या वज्रमूठ सभेत नाना पटोले यांच्या गैरहजेरीतून पडले, तसेच मुंबईत शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आमदारांच्या बैठकीतही दिसले. नानांनी आजारी असल्याचे सांगून महाविकास आघाडीच्या संभाजीनगर मधल्या सभेला दांडी मारली पण दुसऱ्या दिवशी ते लगेच बरे होऊन सुरतला पोचले होते. नानांच्या या राजकीय हालचालीची दखल राष्ट्रवादी काँग्रेसने शांतपणे घेतली आणि त्यांच्या बैठकीत नानांच्या विरोधातला सूर उमटला. इतकेच नाही, तर थेट शरद पवारांनी सूचना केली, की काँग्रेसशी बोलण्याआधी जागा वाटपाबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाशी बोलणी सुरू करावीत. पवारांच्या या सूचनेत महाराष्ट्रात किमान तिरंगी लढतीचे सूतोवाच आहे.
तारू जागा वाटपाच्या खडकावर फुटणार
महाविकास आघाडी वज्रमूठ सभेत तीन पक्षांची मोट बांधलेली दिसत असली, तरी जागा वाटपाच्या खडकावर तिचे तारू फुटणार आहे, हेच यातून दिसून येते. एकदा का राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्यातली जागा वाटपाची बोलणी सुरू झाली की आपोआपच काँग्रेसला स्वतःची “वेगळी” वाट सापडायला सुरुवात होईल. त्यातून जागा वाटपाच्या चर्चेला वेगवेगळे फाटे फुटतील. मग या चर्चेच्या फाट्यांमधून नेमके काय घडेल??, हे सांगायला फार मोठ्या ज्योतिषाची गरज नाही.
खरं म्हणजे काँग्रेसने पहिल्यापासूनच जागा वाटपापेक्षा स्वबळावर निवडणूक लढविण्याचे मनसूबे राखले आहेत आणि नानांच्या मुखातून ते काही वेळा बाहेरही आले आहेत. आता तर नुसते बोलण्यापेक्षा नानांनी प्रत्यक्ष आपल्या राजकीय कृतीतूनच काँग्रेसची “वेगळी” वाट दाखविली असेल, तर आपण तरी काँग्रेसची वाट कशाला बघत बसा?? असे मनात ठेवून जर पवारांनी जागा वाटपाबाबत ठाकरे गटाशी बोला अशी सूचना केली असेल, तर त्यातून दुरंगी ऐवजी तिरंगी लढतीचे चित्र दिसणे यापेक्षा वेगळे काय असू शकेल??, या प्रश्नाचे उत्तर दुसरे काही नाही, हेच आहे!!
ठाकरे गटालाही काँग्रेसची गरज नाही
तशीही शिवसेनेच्या ठाकरे गटाने “दूरदृष्टी” ठेवून प्रकाश आंबेडकरांची युती करून महाराष्ट्रात तिरंगीच काय, पण चौरंगी लढती झाल्या तरी आपली तयारी आहे, असे आधीच दाखवून दिले आहे. मात्र त्यात राजकीय लवचिकता ठेवून राष्ट्रवादीच्या अपेक्षेनुसार त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेपासून प्रकाश आंबेडकरांना दूरही ठेवले आहे. म्हणजे राष्ट्रवादीची एक अपेक्षा ठाकरे गटाने पूर्ण करून जागा वाटपाला अनुकूलता ही दाखवली आहे. पण यातूनच ठाकरे गटाने ही आपल्याला जागा वाटपात काँग्रेसची गरज नाही ही सूचकपणे दाखवून दिले आहे.
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू झाल्या असताना आघाडीतल्याच या “आतल्या” या राजकीय हालचाली पाहता महाराष्ट्रात शिवसेना – भाजपची टक्कर घेताना दुरंगी नव्हे, तर किमान तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे हेच यातून स्पष्ट दिसून येते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App