विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra Winter राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली. या अधिवेशनात राज्यातील कळीचे कायदे, जनहिताचे प्रश्न व विभागीय विकास आदी मुद्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात झालेल्या दिरंगाईवरही या अधिवेशनात गरमागरम चर्चा होण्याची शक्यता आहे.Maharashtra Winter
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदा व महापालिकांचीही निवडणूक होणार आहे. त्याची घोषणा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या घटनाक्रमामुळे राज्य विधिमंडळाचे नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे हे अधिवेशन 8 डिसेंबरपासूनच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.Maharashtra Winter
सरकार व विरोधकांत होणार जोरदार खडाजंगी
या अधिसूचनेत विधानसभा व विधानपरिषदेचे कामकाज 8 डिसेंबर 2025 रोजी अनुक्रमे सकाळी 11 वा. व दुपारी 12 वा. सुरू होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यात हे अधिवेशन किती दिवसांचे असेल म्हणजे ते केव्हा संपुष्टात येईल याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे हे अधिवेशन सरकार एक किंवा दोन आठवड्यांत आटोपते घेईल असे मानले जात आहे. या अधिवेशनात महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज दरवाढ, बेरोजगारी, कथित मतचोरी, कळीचे कायदे आदी मुद्यांवरून सरकार व विरोधकांत जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
सरकारकडून अधिवेशनाची तयारी पूर्ण
दुसरीकडे, राज्य सरकारने या अधिवेशनासाठी तयारीला सुरुवात केली आहे. अधिवेशनाच्या सुरक्षेच्या तसेच लॉजिस्टिक दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. विधिमंडळ सचिवालयाने अधिवेशनासाठी सर्व सदस्यांना सूचना पाठवल्या आहेत. या अधिवेशनासाठी सर्व मंत्र्यांचे निवास व कार्यालये काही काळासाठी नागपुरात हलवण्यात येते. त्यामुळे पुढील काही दिवसांत नागपूरमध्ये राजकारण्यांची ये-जा वाढणार आहे.
राज्य शासनाकडून अधिवेशनासाठी सुरक्षेच्या तसेच लॉजिस्टिक दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. विधिमंडळ सचिवालयाने अधिवेशनासाठी सर्व सदस्यांना सूचना पाठवल्या असून, नागपूरमध्ये रेल्वे व हवाई सेवांमध्येही अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी विधिमंडळ परिसरा व नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
नागपुरात केव्हापासून होते हिवाळी अधिवेशन?
उल्लेखनीय बाब म्हणजे राज्य विधिमंडळाचे पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला होते. तर नागपूर करारानुसार, हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. 1960 मध्ये पहिल्यांदा नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले होते. ते 10 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर असे 27 दिवसांचे अधिवेशन होते. तेव्हापासून कधी 3 आठवडे, तर कधी 2 आठवड्यांचे हिवाळी अधिवेशन होत आहे. 1968 साली सर्वाधिक दिवसांचे हिवाळी अधिवेशन झाले होते. त्यावेळी 18 नोव्हेंबर ते 27 डिसेंबर असे एकूण 28 दिवसांचे अधिवेशन नागपुरात झाले होते. पण त्यानंतर या अधिवेशनाचा कालावधी सातत्याने कमी होत आहे. यंदाही हे अधिवेशन एक किंवा दोन आठवड्यांचे होण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App