विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसला बिहारमधील आपला ऱ्हास पाहूनही मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणे योग्य वाटत असेल तर त्यांना कुणीही थांबवू शकत नाही. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य हे पुढील काही दिवसांतच ठरेल, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे. Kishori Pednekar
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर टीका केली. त्या म्हणाल्या, बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला ऱ्हास पाहून त्यांच्या नेत्यांनी बोध घ्यायला हवा. हा ऱ्हास पाहूनही त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर लढवावी. त्यांना कुणीही थांबवू शकत नाही. पण त्यांचे वरिष्ठ निश्चितपणे थांबवू शकतील.
जे लोक स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आहेत, त्यांना ते कदाचित योग्य वाटत असेल. पण पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांच्या वरिष्ठांनाही हा निर्णय योग्य वाटतो का मोठा प्रश्न आहे. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य हे पुढील काही दिवसांतच कळेल.
काय म्हणाले होते रमेश चेन्नीथला?
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय हा पूर्णतः स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार घेण्यात आल्याचे म्हटले होते. काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल. आम्ही सर्व 227 जागा लढवू. आमची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा मान राखत आम्ही हा निर्णय घेतला.
ही काही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नाही. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जे म्हणतील तेच होईल. भविष्यात काँग्रेसला मजबूत बनवणे हे आमचे काम आहे. काँग्रेस मजबूत व्हावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या भावनांचा मान राखत हा निर्णय घेतला आहे, असे चेन्नीथला म्हणाले.
वर्षा गायकवाड यांनी साधला होता मनसेवर निशाणा
दुसरीकडे, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी ठाकरे गटाच्या मनसेला सोबत घेण्याच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवली होती. त्या म्हणाल्या होत्या, आम्ही देशाचे संविधान मानणारी मंडळी आहोत. सर्वांना सोबत घेऊन जाणारे लोक आहोत. आम्ही सातत्याने मुंबईच्या विकासावर बोलतो. या प्रकरणी सर्वांनी एकत्र येऊन बोलण्याची गरज होती. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने मारहाण केली जाते किंवा कायदा सुव्यवस्था हातात घेतली जाते. विशेषतः त्यांच्याकडून जी भाषा वापरली जाते, ती भाषा आमच्या सुसंस्कृतपणाला शोभणारी भाषा नाही.
काही पक्षांची भूमिका ही मारहाणीची राहिली आहे. लोकांना त्रास देण्याची राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय घ्यावा. पण सध्या ते ज्या लोकांशी चर्चा करत आहेत, त्यांच्याशी आमचे कितपत जमेल हे आम्हाला माहिती नाही. एखाद्या छोट्या टपरीवाल्याला किंवा एखादा दुकानदाराला अथवा एखाद्या समोसेवाल्याला मारहाण करणे ही संस्कृती काँग्रेसमध्ये केव्हाही खपली जाणार नाही. गरिबांवर आपली ताकद दाखवणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेने (ठाकरे गट) त्यांना कुणासोबत जायचे त्याचा निर्णय घ्यावा. पण काँग्रेस पक्ष म्हणून आमचे म्हणणे आहे की, मुंबईत आलेली सर्व मंडळी ही मुंबईकर आहेत. सर्वांनी मुंबईच्या विकासात हातभार लावला आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App