विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Imtiaz Jaleel येथे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एक धक्कादायक आरोप करत पोलिस प्रशासन आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “माझ्यावर दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा केवळ राजकीय दबावामुळे दाखल करण्यात आला आहे.” यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्याचा इशारा दिला.Imtiaz Jaleel
गुन्हा नेमका कशामुळे?
जलील यांनी काही दिवसांपूर्वी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर औद्योगिक वसाहतीतील जमिनीबाबत आरोप केले होते. त्याचवेळी त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये एका समाजाविषयी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करण्यात आला. या विधानावरूनच क्रांती चौक पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री लक्ष्मण हिवराळे या व्यक्तीने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
जलील यांचा पलटवार
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांनी थेट आरोप केला की, “पोलिसांनी राजकीय दबावाखाली तपास न करता थेट एफआयआर दाखल केला आहे. हे वर्तन म्हणजे राजकीय गुलामगिरी आहे.” त्यांनी सांगितले की, इतर काही पोलिस ठाण्यांमध्येही त्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत, पण कोणतीही योग्य चौकशी न करता कारवाई करण्यात आली.
जमिनीच्या वादावर खुलासा
जलील यांनी स्पष्ट केले की, त्यांनी जी जमीन प्रकरणासंदर्भात प्रश्न उपस्थित केले, ती जमीन वर्ग दोनची सरकारी राखीव जमीन आहे. “या जमिनीवर ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिलेले आहे. जर ही जमीन सरकारी आहे, तर मग सरकारवरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार का?” असा परखड सवाल त्यांनी केला.
न्यायालयात जाण्याचा निर्धार
आपल्यावर अन्याय झाला असल्याचे सांगत जलील यांनी स्पष्ट इशारा दिला की, ते हायकोर्टात जाणार आहेत. पोलिस आयुक्त तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरोधातही ते न्यायालयात तक्रार दाखल करणार आहेत. एवढेच नाही तर त्यांनी “जर पोलिस हे सरकारच्या इशाऱ्यावर चालत असतील, तर त्यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करावे लागेल,” असेही तिखट विधान केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App