महाराष्ट्रात आज (दि. 21 डिसेंबर) 32 जिल्ह्यांमध्ये 105 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान सुरू आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवायच ही निवडणूक पार पडत आहे. तत्पूर्वी, निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता. सोमवारी प्रचार संपून आज मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. Election: Voting begins for 105 Nagar Panchayats in 32 districts of the Maharashtra
वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात आज (दि. 21 डिसेंबर) 32 जिल्ह्यांमध्ये 105 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान सुरू आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवायच ही निवडणूक पार पडत आहे. तत्पूर्वी, निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता. सोमवारी प्रचार संपून आज मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीसाठी सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील केज, वडवणी, शिरूर, पाटोदा आणि आष्टी या पाच नगरपंचायती साठी मतदान होत आहे. एकूण 65 जागांसाठी 216 उमेदवार रिंगणात उतरले असून आपलं नशीब आजमावत आहे. दरम्यान निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झालीय. संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. थंडीचा कडाका असल्याने भल्या सकाळी मतदान केंद्रावर मात्र मतदारांचा प्रतिसाद कमी दिसून आला.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा व भातकुली नगरपंचायतीच्या ३० सदस्यपदांकरिता आज मतदान होत आहे. यात १६,१८९मतदार मतदानाचा हक्क बजावतील, यामध्ये तिवसा नगरपंचायतच्या १४ जागांसाठी ६२ उमेदवार रिंगणात असून भातकुलीच्या १६ जागेसाठी ६० उमेदवार रिंगणात आहेत. तिवसा नपवर महिला व बालकल्याण मंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या काँग्रेस पक्षाची सत्ता होती, तर भातकुली नगरपंचायतवर आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेची सत्ता होती, त्यामुळे या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
यवतमाळ सहा नगरपंचायतीमधून ८४ जागांसाठी ४३५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. ४७ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. राळेगाव नगरपंचायतीत १४ जागांसाठी ८२ उमेदवार रिंगणात आहेत. कळंब नगरपंचायतीमध्ये १३ जागांसाठी ६३ उमेदवार, महागाव नगरपंचायतीमध्ये १३ जागासाठी ९१. मारेगाव नगरपंचायतीमध्ये जागांसाठी १४ ९०. झरीजामणी नगरपंचायतीमध्ये १७ जागांसाठी ८७ तर बाभूळगाव ग्रामपंचायतीमध्ये १३ जागांसाठी ६२ उमेदवार आपले भविष्य आजमावित आहेत. याबरोबरच ढाणकी नगरपंचायतीत दोन जागांसाठी मतदान होत आहे.बाभूळगावात पाच हजार ७० मतदार असून पुरुष मतदार दोन हजार ५४४, तर महिला मतदारांची संख्या दोन हजार ५२६ इतकी आहे. कळंब नगरपंचायतीत १४ हजार २०६ मतदार आहेत. त्यात पुरुष सात हजार ८८, महिला सात हजार ११८, राळेगावात १२ हजार ५२७ मतदार आहेत. झरीजामणी येथे दोन हजार २६८, महागावमध्ये सात हजार ५२०, तर मारेगाव नगरपंचायतीमध्ये सहा हजार ५०७ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहे.
सांगली जिल्ह्यातील 3 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. कवठेमहांकाळ, खानापूर आणि कडेगाव या नगरपंचायतीची निवडणूक होत असून प्रत्येकी 13 जागांसाठी 125 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर 40 मतदान केंद्रावर 23 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत दिगग्ज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्षीयआघाडी अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांचा पॅनल विरोधात भाजप खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री आणि शिवसेना नेते अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे आणि काँग्रेसचे स्थानिक नेत्यांच पॅनल यांच्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. कडेगाव नगरपंचायतीमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि इतर स्थानिक आघाड्या अशा बहुरंगी लढत असून कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खानापूर नगरपंचायतीमध्ये सध्या काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता असून याठिकाणी काँग्रेस, शिवसेना आघाडी विरुद्ध भाजप आणि राष्ट्रवादी आणि स्थानिक आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. या ठिकाणी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या १३ प्रभागांसाठी मतदान होत असून ४१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. ९ हजार १७१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी निवडणूक विभागाकडून सर्व तयारी पूर्ण झाली झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी १३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. ६५ कर्मचारी, १३ पोलीस कर्मचारी व १० राखीव कर्मचारी नेमण्यात आले आहेत. १३ मतदान केंद्रांमध्ये प्रभाग १ कविलकाटे, प्रभाग २ भैरववाडी, प्रभाग ७ डॉ आंबेडकर नगर, प्रभाग ८ मस्जिद मोहला यांच्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल कुडाळ येथे, प्रभाग ४ बाजारपेठसाठी जिल्हा परिषद कन्या शाळा, प्रभाग ५ कुडाळेश्वरवाडी, प्रभाग ६ गांधी चौकसाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा, प्रभाग ९ नाबरवाडी, प्रभाग १५ मधली कुंभारवाडीसाठी जिल्हा परिषद कुंभारवाडी शाळा, प्रभाग ११ वाघ सावंत टेंब, गणेशनगर, प्रभाग १२ हिंदू कॉलनी, प्रभाग १३ श्रीरामवाडी व प्रभाग १४ अभिनव नगरसाठी कुडाळ या निवडणुकीत भाजप, काँग्रेस हे पक्ष स्वतंत्र लढत आहेत, तर शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष आघाडी करून निवडणूक लढवित आहेत. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आता निवडणुकीच्या निकालांकडे जिल्हावासीयांचे डोळे लागले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App