विशेष प्रतिनिधी
पुणे : विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. २० ऑगस्टला सकाळी ११ वाजता होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये एका विशेष समारंभात पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते. Editor of ‘The Focus India’ Vinayak Dhere conferred Narad Journalism award
या पुरस्कार उपक्रमाचे हे ११वे वर्ष असून देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. कोरोना महामारीमुळे गेली २ वर्षे हा पुरस्कार कार्यक्रम न झाल्यामुळे २०२०, २०२१ आणि २०२२ या तीन वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येणार आहेत. या प्रत्येक वर्षासाठी ज्येष्ठ पत्रकार, आश्वासक पत्रकार, छायाचित्रकार/व्यंगचित्रकार आणि सोशल मीडिया या वर्गातून पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप ज्येष्ठ पत्रकार यांना २१ हजार रुपये तर अन्य तीन पुरस्कार ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे राहील.
ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ’टाईम्स ऑफ इंडिया’ पुण्याचे उप निवासी संपादक अभिजित अत्रे आणि नाशिक येथील दैनिक ’देशदूत ’च्या संपादक वैशाली बालाजीवाले यांचा समावेश आहे. ’केसरी’च्या कोल्हापूर ब्यूरो चीफ अश्विनी टेंबे, ’महाराष्ट्र टाईम्स’ पिंपरी-चिंचवडचे विशेष प्रतिनिधी सुनील लांडगे आणि ’सकाळ’ पुणेच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांची आश्वासक पत्रकार पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सांगलीचे आदित्य वेल्हाळ आणि पुण्यातील ’टाईम्स नाऊ वाहिनी’चे व्हिडियो जर्नलिस्ट रूख्मांगद पोतदार यांना छायाचित्रकार तसेच पुण्याचे घनश्याम देशमुख यांना व्यंगचित्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सोशल मीडिया पुरस्कारांसाठी ‘द फोकस इंडिया’चे संपादक विनायक ढेरे, पुण्यातील अमित परांजपे आणि सांगली येथील विनीता तेलंग या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरची निवड झाली आहे.
यापूर्वी हे पुरस्कार ’ए बी पी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, ’झी२४ तास’चे डॉ. उदय निरगुडकर, ’तरुण भारत’ बेळगावचे संपादक किरण ठाकूर, ’दिव्य मराठी’चे संपादक प्रशांत दीक्षित, ’महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक पराग करंदीकर, ’लोकसत्ता’ पुण्याचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ पत्रकार कै. दिलीप धारूरकर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर व ’आज का आनंद’चे संपादक श्याम अग्रवाल आदींना पुरस्कार देण्यात आले आहेत.
हा कार्यक्रम शनिवार २० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फीथिएटरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे उपस्थित राहणार आहेत. या समारंभास माध्यम क्षेत्रातील पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विश्व संवाद केंद्र व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रीय विचारांनी प्रेरित विश्व संवाद केंद्राचे देशभर कार्य असून विविध राज्यातून ३० केंद्र कार्यरत आहेत. पुण्यातील केंद्राची स्थापना २०१४ झाली असून पश्चिम महाराष्ट्र हे केंद्राचे कार्यक्षेत्र आहे. विश्व संवाद केंद्र राष्ट्रीय विचारांच्या प्रसार-प्रचाराचे कार्य करते. त्यासाठी केंद्रातर्फे माध्यमांशी माहितीची देवाणघेवाण करून समन्वय ठेवला जातो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App