विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाराष्ट्राच्या विकासावर तसेच येथील पायाभूत सुविधांवर भाष्य केले. तसेच महायुतीमधील अंतर्गत राजकारणावरही त्यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्र पुढील 4-5 वर्षात इतका पुढे जाईल, देशात कोणीच स्पर्धा करू शकणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच येथील पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने होत असलेल्या श्रेयवादाच्या लढाईवर बोलताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठलीही स्पर्धा नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद्या, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकार्पण होत आहे. या प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, ‘आमच्यात कसलीही स्पर्धा नाही’ असे स्पष्ट करत फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकला आहे. ते म्हणाले, आमची एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही ‘इन्फ्रा फॅमिली’ मध्ये आहोत. आमच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प आमच्याच काळात पूर्ण होत आहेत. आमच्यात श्रेयवादाचे कारण नाही. कार्यकर्त्यामध्ये सीमित बुद्धी असते, आम्ही इन्फ्रा फॅमिली आहोत, त्यामुळेच आमच्यात कुठलाही श्रेयवाद नाही.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘डॉलर’वर आमचे टार्गेट मागे पुढे होते. आम्ही आमच्या टार्गेटसाठी ऑन ट्रॅक आहोत. पुढील काही वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यूएई किंवा सिंगापूर यांना मागे टाकेल. कारण, व्हिजन इन अँक्शनमध्ये आम्ही आहोत. महाराष्ट्र पुढील 4-5 वर्षात इतका पुढे जाईल, देशात कुणीच स्पर्धा करू शकणार नाही. राज्य सरकारने घेतलेल्या 100 दिवस कार्यक्रमामुळे कामाची क्षमता वाढली आहे. ज्या 20 गोष्टींसाठी जनतेला यावं लागते, त्या सेवा आम्ही AI च्या मदतीने सुलभ करू.
मेट्रो 3 मुळे 35 टक्के ट्रॅफिक कमी झाले. या मेट्रोसाठी विरोध ठाकरेंनी केला, पण सुप्रीम कोर्टानेही योग्य तोडगा काढला, असे फडणवीस यांनी सांगितले. 2030 साली 52 टक्के ऊर्जा रिन्यूएबल होईल. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, ज्याने एनर्जी प्लॅनिंग केलेय. आपल्या ऊर्जा खात्याला 52 अवॉर्ड मिळाले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
शरद पवारांविषयी काय म्हणाले फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझे सगळे मंत्री माझे व्हीजन राबवत आहेत. शरद पवारांचे सातत्य हे शिकण्यासारखे आहे. शरद पवारांकडे कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे. तसेच मराठी माणूस पंतप्रधान बनेल. पण 2029, 2034 किंवा 2039 कधी बनेल माहीत नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.
Devendra Fadnavis Clarification on Discussions Regarding Credit-Claiming with Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- Punjab : पंजाबमध्ये रेल्वे रुळावर स्फोट पाकिस्तानने घडवला, मालगाडी जाताना स्फोट, बॉम्ब लावणाऱ्याचे तुकडे
- White House : व्हाईट हाऊस डिनर गोळीबार; आरोपीवर अध्यक्ष ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप
- बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये प्रादेशिक घराणेशाहीला दणका; राष्ट्रीय पक्षांना फायदा!!
- KEM : ‘केईएम’चे नामांतर होणार; मुंबई मनपा प्रशासनाचा हिरवा कंदील; ठाकरे शिवसेनेच्या विरोधानंतरही लोढांच्या मागणीला यश